K. P. Patil's press conference
बिद्री कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बैठकीत बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील   Pudhari News Network
कोल्हापूर

'बिद्री'ची अंधाऱ्या रात्रीची चौकशी केवळ आमदार आबीटकरांमुळे

पुढारी वृत्तसेवा

बिद्री: पुढारी वृत्तसेवा : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी के. पी. पॅटर्नला पसंती दिल्यामुळे माजी आमदार प्रकाश आबीटकर यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार ? याचा अंदाज आल्याने केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी 'बिद्री ' ची शुक्रवारी (दि. २१) अंधाऱ्या रात्री चौकशी लावली. या पाठीमागे आमदार आबीटकर यांचा हात असल्याचा घणाघाती आरोप 'बिद्री'चे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला.

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शुक्रवारी रात्री इथेनॉल प्रकल्पाची चौकशी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२४) दुपारी झालेल्या पत्रकार बैठकीत पाटील यांनी हा आरोप केला.

Summary

बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी अंधाऱ्या रात्री चौकशी लावली.

'बिद्री ' चा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित

माजी आमदार के. पी. पाटील यांचा आमदार आबीटकर यांच्यावर घणाघाती आरोप

'बिद्री ' चा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित

के. पी. पाटील म्हणाले की, गेल्या दोन निवडणूकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला फसविले आहे. त्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घससरत चालली आहे. तुम्ही लावलेल्या चौकशीत पथकाने केलेल्या तपासणीत अक्षेपार्ह असे काहीही सापडले नाही. उलट 'बिद्री ' चा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तुमची सत्तेची दहा वर्षे विकास कामे कमी आणि 'बिद्री ' च्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कारकीर्द असलेले आबिटकर हे केवळ बिद्री आणि के. पी. द्वेषाने पछाडलेले आहेत. गेल्या दहा वर्षात 'बिद्री ' ची प्रगती कशी रोखता येईल. यासाठीच ते शासन दरबारी कार्यरत राहिले आहेत.

डिस्टलरी प्रकल्पाचे लायसन्स कोणी अडविले

अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेला प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. 'बिद्री ' च्या प्रगतीचा शिलेदार ठरलेल्या सहवीज प्रकल्पात त्यांनी जमेल तेवढे अडथळे आणले. राज्यात अव्वल ठरलेल्या सहवीज प्रकल्पाच्या टॉवर लाईनला विरोध करुन प्रकल्प चालू करण्यापासून रोखला. सुमारे १२० कोटींच्या प्रकल्पाचे व सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. डिस्टलरी प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य अनुशंगिक परवाने व लायसन्स कोणी अडविले, हे साऱ्या महाराष्ट्राला समजले.

आता विधानसभेचे घोडे मैदान दूर नाही.

उच्च कार्यक्षमतेच्या मिळालेल्या पुरस्कारांविषयी त्यांनी शंकांचे वादळ उठवीत खोटे नाटे आरोप केले. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्षे निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून कुणी दबाव टाकला ? सहकार व पणन विभागाने सभासद भागभांडवल १५ हजार रुपये करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरच आम्ही लागू केला; परंतु सभासदांची आर्थिक ओढाताण होऊ नये, म्हणून आम्ही टप्पे घालून दिले. याबाबतही या आमदारांनी आगपाकड केली व न्यायालयात दावा दाखल केला. नसलेल्या पावसाचे कारण पुढे करीत 'बिद्री ' ची निवडणूक केवळ सत्तेच्या जोरावर पुढे ढकलली. पण सभासदांनी योग्य मुहूर्त काढला आणि 'बिद्री ' च्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्या आमदारांना सभासदांनी त्यांची योग्य जागा दाखवली. आता विधानसभेचे घोडे मैदान दूर नाही. जे 'बिद्री ' च्या सभासदांच्या मनात आहे तेच राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदारच हा हिशोब चुकता करणार आहेत.

खापर.... आणि राजकीय चौकशी !

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. पण त्यांच्या विरोधात असलेले जनमत मतपेटीतून व्यक्त झाले. तसेच मुदाळ गावच्या सरपंच माझ्या सुनबाई असल्याने राजशिष्टाचार म्हणून त्यांनी खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार केला. तेथे माझी उपस्थिती असणे गैर नाही. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायत जमिनीवरून जाणार आहे. बहुतांश शेतकरी भुमिहिन होणार आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून संबंधित शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडणे हे माझे कर्तव्यच होते. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू घेतली. या सर्वाचे खापर या राजकीय चौकशीत दडले आहे.

SCROLL FOR NEXT