जयसिंगपूर : कुंथलगिरी (जि.धाराशिव) येथे ७५ वर्षीय प. पू. आचार्य श्री १०८ वर्धमानसागरजी महाराज यांनी गत २३ जूनपासून 'यम सल्लेखना' व्रत स्वीकारले होते. त्यांचे रविवारी रात्री सल्लेखनापूर्वक समाधीमरण झाले. आचार्यश्रींना सर्वोच्च आणि अत्यंत कठोर धार्मिक व्रत करून सुमारे 13 दिवसांनी समाधी मरण आले.
प. पू. आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे (दीक्षेपूर्वीचे) नाव पायगोंडा आदगोंडा पाटील होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९५१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे झाला आहे. त्यांनी २ फेब्रुवारी २००४ रोजी इचलकरंजी येथे शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर प. पू. आचार्य श्री १०८ सन्मती सागरजी महाराज यांच्या करकमलांतून मुनी दीक्षा ग्रहण केली. तर १८ फेब्रुवारी २०११ रोजी कोथळी (ता.शिरोळ) येथे त्यांना आचार्य पद बहाल केले होते. आचार्य पद मिळाल्यानंतर ते 'प. पू. आचार्य श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज' या नावाने विख्यात आहेत.
जैन धर्म परंपरेनुसार, जेव्हा शरीर वृद्धत्वामुळे आत्मसाधनेला आणि संयमाला साथ देत नाही, तेव्हा स्वेच्छेने अत्यंत शांत चित्ताने अन्न-जलाचा टप्प्याटप्प्याने त्याग केला जातो. यालाच 'सल्लेखना समाधी' किंवा 'समाधीमरण' असे म्हणतात. शरीर आणि मनातील क्रोध, मान, माया, लोभ यांसारख्या सर्व वासना मंद करून आत्म्याला त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात विलीन करणे हा या व्रत उपासनेचा मुख्य हेतू असतो. हा व्रत आजा श्री 23 जून रोजी धारण केले होते. त्यांच्या यम सल्लेखना काळात कर्नाटकसह सांगली - कोल्हापूर भागातील श्रावक - श्राविका दर्शनासाठी मोठी गर्दी करत होते.