

संतोष बामणे
जयसिंगपूर : जिथे शिवरायांचे स्मरण होते, तिथे थकलेल्या शरीरातही नवसंजीवनी निर्माण होते, याच प्रेरणेतून उदगाव (ता.शिरोळ) येथील दोन धाडसी तरुण निरंजन दिन्नी आणि गजानन चव्हाण यांनी 'मॅन versus सह्याद्री' (मुक्त) मोहिमेची सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीचा वारसा जपण्यासाठी या दोन्ही तरुणांनी उदगाव जि.कोल्हापूर ते किल्ले रायगड अशी ३१० किलोमीटरची ऐतिहासिक व खडतर पायी वारी सुरू केली आहे.
सोमवारी रोजी सायंकाळी उदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना वंदन करून आणि मंगळवारी रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे आशीर्वाद घेऊन या महाप्रवासाला प्रारंभ झाला. कडक ऊन, घाटातील कठीण वाटा, अंगाचा थरकाप उडवणारे जंगल ट्रेक अशा अनेक आव्हानांचा सामना करत हे दोन्ही तरुण रोज मैलो-मैल प्रवास करणार आहेत. जात असताना ठिकठिकाणी शिवभक्ताकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
उदगाव येथे या पायी वारीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सलीम पेंढारी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सागर कदम, लाडू वरेकर, शीतल अंबी, अनिल वरेकर, कृष्णा उगळे, मंदार माने, सुनिल साखळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंगपूर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार घालून पायी वारीला सुरुवात करण्यात आली.
६ जून शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार
हा संपूर्ण प्रवास गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यासाठी समर्पित आहे. ३१० किलोमीटरचा हा खडतर टप्पा पूर्ण करून ४ जून रोजी हे दोन्ही तरुण किल्ले रायगडावर पोहोचणार आहेत. त्यानंतर ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'त ते सहभागी होऊन आपले अंतिम ध्येय पूर्ण करतील. उदगावच्या या दोन्ही सुपुत्रांच्या साहसी मोहिमेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.