कोल्हापूर

कोल्हापूर : कासारी मध्यम प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा 

दिनेश चोरगे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथील कासारी मध्यम प्रकल्पात आजमितीला ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी ४१ टक्के पाणीसाठा धरणात होता. गतवर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी उन्हाची तीव्रता, सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणी टंचाईची भविष्यातील शक्यता गृहीत धरून पाणी जपून वापरण्याचा सल्ला पाटबंधारे विभागाने दिला आहे.

कासारी मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी असून शाहूवाडी तालुक्यातील २० व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावातील सुमारे ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे.  धरणाचे बुडीत क्षेत्र ७७०.६१ हेक्टर आहे.  धरणावर वीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी कासारी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान कासारी नदीवर पाणी उपसाबंदी लागू करण्यात आली होती. यंदा मात्र अद्याप पाणी उपसाबंदी नसल्याने शेतकऱ्यांसाठी ही जमेची बाजू आहे. मात्र काही ठिकाणी कासारी नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेती पिके करपू लागली आहेत त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह शेतीपिकांना बसत आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी ६१३.९० मी इतकी असून एकूण उपयुक्त पाणीसाठा ३७.७५ दलघमी आहे. धरणात १.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ६१२.२० मी पाणीपातळी,  उपयुक्त पाणीसाठा ३२ दलघमी आणि धरणात १.१३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे १८ एप्रिल २०२३ रोजी भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहित धरुन पाणी उपसाबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. या लघु प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.

गतवर्षी व यंदा पाणी उपसाबंदी कालावधीचे वेळापत्रक असे :

सन             उपसाबंदी कालावधी          दिवस
२०२३         दि १८ एप्रिल ते २० एप्रिल        ३
२०२४              अद्याप नाही                    ०

पाणीसाठ्यात तफावत

यंदाचा आणि गेल्यावर्षी १५ एप्रिलचा कंसातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये धरणनिहाय असा : राधानगरी ३.०० (३.१५) , तुळशी १.७४ (१.५९), वारणा ९.७० (१४.३३), दुधगंगा ७.०३ (५.९८), कासारी १.३३ (१.१३), कडवी १.४५ (१.३०), कुंभी १.६१ (१.५३), पाटगाव १.८८ (१.४९).

कासारी मध्यम प्रकल्पात गतवर्षीपेक्षा पुरेसा पाणीसाठा असून जुनअखेर पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
– संदीप दावणे, सहाय्यक अभियंता, पंचगंगा पाटबंधारे  विभाग, कोल्हापूर

   हेही वाचा :

SCROLL FOR NEXT