सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी वास्को-पटना सुपरफास्ट एक्स्प्रेस सध्या कोकणातील स्थानिक प्रवाशांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. ही गाडी दर बुधवारी धावते; परंतु गोवा राज्यातील वास्को आणि मडगाव स्थानकावरूनच ती इतकी तुडुंब भरून येते की, सावंतवाडी रोड स्थानकावर गाडीत पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे.
रेल्वे प्रशासनाने या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव थांबा दिला असला, तरी त्याचा उपयोग येथील जनतेपेक्षा परप्रांतीयांच्या प्रवासा-साठीच अधिक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सुरक्षिततेचा अभाव आणि महिला प्रवाशांची परवड या गाडीतील प्रवासादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गाडीमध्ये नेहमीच परप्रांतीयांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे स्थानिक प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे. विशेषतः आपल्या कुटुंबाला आणि महिलांना घेऊन या गाडीने प्रवास करणे आता धोकादायक वाटू लागले आहे. सुरक्षित प्रवासाची कोणतीही खात्री रेल्वे प्रशासन देऊ शकत नसल्याने, प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून संतापाची लाट उसळली आहे.
आरक्षित डब्यांची झाली 'जनरल' अवस्था रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आरक्षित डब्यांची (Reserved Coaches) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या डब्यांमध्ये विनाआ-रक्षित प्रवाशांच्या घुसखोरीमुळे त्यांचे रूपांतर अक्षरशः जनरल डब्यांत झाले आहे. ज्या प्रवाशांनी महिनाभर आधी आरक्षण केले आहे, त्यांनाही स्वतःच्या हक्काच्या जागेवर बसणे कठीण झाले आहे. या गर्दीमुळे सावंतवाडी स्थानका वरून गाडीत चढणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांना आपले तिकीट रद्द करावे लागते. यामुळे रेल्वेला दर आठवड्याला हजारो रुपयांचा परतावा द्यावा लागत असून मोठे आर्थिक नुकसानही होत आहे.
कोकणी माणसाचा सवाल आमच्या मार्गावर या गाड्या कशासाठी?
सावंतवाडी स्थानकावरील या गाडीचा थांबा केवळ नावापुरताच आहे. या गाडीमुळे कोकणात परप्रांतीयांची संख्या वाढत आहे, पण स्थानिक कोकणी माणसाला मात्र या सेवेचा कोणताही लाभ मिळत नाही. "ज्या गाड्यांचा फायदा कोकणातील जनतेला नाही, त्या गाड्या आमच्या मार्गावर कशासाठी?" असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. परप्रांतीयांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन स्थानिक प्रवाशांच्या सोयीकडे आणि सुरक्षेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.
पुणे आणि कल्याणसाठी हव्यात स्वतंत्र गाड्या
सध्या कोकणातून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे, मात्र रेल्वे प्रशासन या गरजेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. वास्को-पटना सारखी अव्यवस्थित गाडी चालवण्यापेक्षा, पुणे-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी या मार्गावर नियमित गाड्या सुरू केल्यास त्याचा थेट फायदा येथील स्थानिक जनतेला आणि चाकरमान्यांना होईल. पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरदारांची संख्या मोठी असतानाही पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कोकणच्या हक्काच्या गाड्या सुरू कराव्यात, अन्यथा कोकणी जनतेचा रोष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.