दोडामार्ग : तिलारी घाट उतरत असताना तीव्र उतार व वळणावर एक कंटेनर अडकल्याची घटना रविवारी रात्री घडली. अडकलेल्या कंटनेरमुळे संपूर्ण रस्ता व्यापल्याने या घाटमार्गातील वाहतूक ठप्प झाली. परिणामी, इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे तिलारी घाटातून सध्या अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना व तसे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिलेले असताना हा कंटेनर तिलारी घाटातून प्रवास कसा करत होता? असा सवाल उपस्थित होत आहे.
तिलारी घाट हा तीव्र उतार व यू आकाराच्या वळणाचा असून घाटातील रस्ता अरुंद आहे. परिणामी घाटात लांब व मोठी अवजड वाहने अडकून अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहतूकही पूर्णतः ठप्प होऊन इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा अश्या अपघातांमुळे तिलारी घाट दहा-दहा तासांहून अधिक वेळ ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घाटात अवजड वाहनांमुळे होणारे वाढते अपघात लक्षात घेता हा घाट 20 जून ते 31 ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत अवजड वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकर्यांनी पारित केले आहेत. शिवाय याबाबत संबंधित सार्व. बांधकाम उपविभाग, पोलीस आणि आरटीओ यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशात नमूद केले. असे असतानाही या घाटातून अवजड वाहतूक राजरोसपणे चालू असल्याचे वारंवार दिसून येते.
रविवारी रात्री घाटमाथ्यावरून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी एक कंटेनर तिलारी घाट उतरत होता. मात्र घाटाच्या पूर्वार्धात असलेल्या तीव्र उताराच्या व यू आकाराच्या वळणाचा चालकास अंदाज आला नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कंटेनर दरीत कोसळण्यापासून बचावला. यावेळी चालकाने कंटेनर मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे तेवढी जागा नसल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा अडकून राहिला. अश्या प्रकारे संपूर्ण रस्ता कंटेनरने व्यापल्याने वाहतूक ठप्प झाली. दुचाकी व्यतिरिक्त अन्य वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडली. यामुळे अनेक वाहनचालक व प्रवाशांना भर रात्री नाहक त्रास सहन करावा लागला. मालवाहतूक करणार्या काही छोट्या वाहन चालकांनी रस्त्याच्या खचलेल्या बाजू पट्टीतून धीटाईने वाहने नेली. या घाटातून अवजड वाहनांना बंदी असतानाही हा कंटेनर घाटात आलाच कसा? असा सवाल प्रवासी व वाहन चालकांतून होत आहे.