सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेबाबत प्रचंड उत्सुकता होती. या पहिल्याच सभेत आक्रमक आणि अभ्यासू सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ५० पैकी ४० सदस्य नवीन असल्याने सर्वांनाच कामकाजाची उत्सुकता होती.
जि.प. अध्यक्ष आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकारी विराजमान झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता सभेला सुरुवात झाली. 'वंदे मातरम्', राष्ट्रगीत आणि 'जय जय महाराष्ट्र माझा ही गीते गाऊन आणि दिवंगतांना श्रद्धांजली वाहून कामकाजाला सुरुवात झाली. विषय पत्रिकेवरील एकूण २२ विषयांचे वाचन सुरू होताच प्रशासकीय ठरावांवरून सदस्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली.
प्रशासनाने मांडलेल्या ठरावांचा सविस्तर तपशील द्यावा, अशी ठाम मागणी सदस्यांनी केली. तसेच, सभागृहातील बंद वातानुकूलित यंत्रणा, अपुरे व्हेंटिलेशन आणि बंद माईक यांसारख्या असुविधांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. ज्येष्ठ सदस्यांच्या सूचनेनुसार काही विषय पुढील बैठकीसाठी राखून ठेवण्यात आले. त्यानंतर सभापतींचे खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
आयत्या वेळेच्या विषयांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, बालक क्रीडा स्पर्धा आणि शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. विशेषतः, आरोग्य विभागाच्या औषध वाटप आणि इतर सुविधांवरून सदस्य व अधिकारी यांच्यात घमासान चर्चा झाली. यावर जि.प. अध्यक्षांनी आरोग्य विभागाला दोन-चार दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले.
तसेच, पूर्वपरवानगीशिवाय स्वतः उपस्थित न राहता बैठकीला कनिष्ठ प्रतिनिधी पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी सभागृहाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा देण्यात आला. अशा गैरहजर अधिकाऱ्यांची तक्रार थेट पालकमंत्र्यांकडे केली जाईल, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले. एकंदरीत पहिल्याच सभेत सदस्यांनी प्रशासनाला जोरदार धक्का दिला.
औरंगाबाद उल्लेखावरून सदस्य आक्रमक
एका महिला अधिकाऱ्याने स्वतःची माहिती देताना 'छत्रपती संभाजीनगर' ऐवजी औरंगाबाद या जुन्या नावाचा उल्लेख केल्याने सभागृहातील सदस्य आक्रमक झाले. संतप्त सदस्यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरत माफीची मागणी केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तत्काळ सभागृहाची माफी मागून आपल्या माहितीत सुधारणा केली.