कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणार्या 'फ्लाय 91' या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की कंपनीच्या व्यवस्थापनावर आली. विशेष म्हणजे तब्बल एक तासाहूनही अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी 50 प्रवाशांना घेवून 'टेक ऑफ' घेण्याच्या तयारीत असलेले फ्लाय 91 कंपनीचे विमान हवेत न झेपावताच ते विमान पायलटने माघारी घेत पॅसेंजर टर्मिनलसमोर आणून उभे केले. व प्रवाशांना खाली उतरवून फेरी रद्द केल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले.Chippy Airport
त्यानंतर अर्ध्या तासाने आपल्या 10-15 स्टाफना घेवून ते विमान मोपाच्या दिशेने रवाना झाले. हवेच्या वाढत्या दाबामुळे विमान टेक ऑफ घेवू शकले नसल्याचे कारण व्यवस्थापनाकडून देवून वेळ मारून नेण्यात आली.
मात्र उपलब्ध माहितीनुसार, त्या नियोजित विमानाचा व्यवस्थापनाकडून चुकीचा रूट (हवाई मार्ग) टाकण्यात आला होता. त्यामुळेच ऐनवेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेले विमान रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचे समजते. Chippy Airport
सिंधुदुर्गातील बहुचर्चित अशा सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून दिड वर्षापुर्वी अलायन्स एअरची प्रवाशी वाहतुक सेवा सुरू आहे. मात्र ही सेवा रामभरोसे असल्यामुळे आधिच प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. त्यातच देशांतर्गत सेवा देणारी फ्लाय 91 ही कंपनी प्रवाशी वाहतूक सेवा देण्यासाठी चिपी विमानतळावर सज्ज झाली. फ्लाय 91 कंपनीचे पहिले विमान चिपी विमानतळावरून सोमवारी शुभारंभाच्या दिवशीच 58 प्रवाशांना घेवून बेंगळूरूला मार्गस्थ झाले. त्यानंतर मंगळवारी त्याच कंपनीचे विमान हैदराबादसाठी 12 वाजुन 10 मिनिटांनी टेक ऑफ घेणार होते. ते विमान 1 वाजून 56 मिनिटांनी हैदराबादला पोहोचणार होते.
हैदराबादला जाण्यासाठी कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजक, व्यवसायिक, माध्यम प्रतिनिधी यांची निवड केली होती. त्या सर्व प्रवाशांना बोर्डींग पासही देवून तपासणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत विमानात बसविण्यात आले. विमानातील एअर हॉस्टेसने विमान टेक ऑफ घेण्यापूर्वी देण्यात येणार्या आवश्यक त्या सर्व सुचना प्रवाशांना दिल्या. रन – वे वरील काही अंतरावर विमान मार्गस्थ झाले. मात्र, त्या विमानाने हवेत टेक ऑफ घेतलाच नाही, जवळपास एक तासहून अधिक वेळ ते विमान प्रवाशांसह रन-वे वरच थांबले होते.
आतील प्रवाशांनी काही वेळाने विमानाच्या व्यवस्थेबाबत आपआपसात चर्चा सुरू केली. त्यानंतर विमानामधील कंपनीच्या मेंबर्संनी प्रवाशांना पाणी, बिस्किटची व्यवस्था केली. काही वेळातच विमान टेक ऑफ घेईल, असे सांगून प्रवाशांना काहीसा धीर दिला. मात्र, पुढच्या काही मिनिटात रन-वे वर टेक ऑफ घेण्यासाठी गेलेले विमान पुन्हा पॅसेंजर टर्मिनलच्या समोरील खुल्या जागेत पायलटने आणून लावले. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. व तांत्रिक अडचणीचे कारण देत विमान फेरी रद्द केल्याचे व्यवस्थ्यापनाने जाहीर केले. अशाच प्रकारे विमानसेवा राहिली तर प्रवाशी कसे येणार? यापुर्वीची एअर अलायन्स कंपनीची व्यवस्था अशीच असल्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे या कंपनीने तरी प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
हवेच्या दाबाचे कारण देत फ्लाय 91 विमान कंपनीने हैदराबादकडे जाणारे विमान रद्द केले. मात्र त्याच दिवशी एअर अलायन्सचे मुंबईहून सिंधुदुर्ग ( चिपी ) विमानतळावर प्रवाशांसह आलेले विमान पुन्हा सिंधुदुर्ग (चिपी) ते मुंबई असे टेक ऑफ घेत मंगळवारी सायंकाळी मार्गस्थ कसे झाले? असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा