देवगड : हवामान विभागाने ३ ते ७ जुलैदरम्यान समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा तसेच मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर देवगड तालुक्यात त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. समुद्र खवळल्याने उंच लाटा किनाऱ्याला धडकत असून, किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
शुक्रवारी देवगड तालुक्यात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत ९४९ मिलिमीटर पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे चित्र असून, मुसळधार पावसामुळे सखल भागातील भातशेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे हिंदळे येथील जनार्दन महादेव राणे यांच्या गोठ्यावर मोठे झाड कोसळून नुकसान झाले. तसेच कातवणेश्वर येथील संजय तुकाराम आचरेकर यांच्या गोठ्याची कंपाउंड वॉल कोसळून अंदाजे २२ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही घटनांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. शनिवारी सायं. ६.४५ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मळई येथील कल्याण कणेरकर यांच्या घरांनजीक असलेल्या वळणावर महाकाय वटवृक्ष जमीनदोस्त झाला. हा वटवृक्षामुळे वीज वाहिन्या तुटल्या. त्यामुळे मळई भागातील वीज पुरवठा खंडित झाला. देवगडहून मळईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
समुद्रातील उग्र परिस्थिती लक्षात घेऊन किनारपट्टी भागातील नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे तसेच किनारपट्टीवर लावलेले बॅनर तातडीने हटवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. किनारपट्टी परिसरात सुरू असलेली विविध कामे तात्पुरती बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कुणकेश्वर सागरी महामार्गलगतची दुकानेही खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे सखल भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, महामार्गाच्या साईडपट्टीवर टाकलेली मातीही पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग अद्याप कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.