

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसांपासून सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागांत झाडे कोसळणे, रस्ते बंद होणे, विद्युत वाहिन्यांना धोका निर्माण होणे तसेच घरांचे नुकसान होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वाळपई अग्निशमन दलाची यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत आहे.
हौंडा येथील नारायणनगर परिसरात गणपती मंदिराजवळ सोमवारी सकाळी रस्त्यावर तसेच एका गॅरेजवर झाडाचा मोठा भाग कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सकाळी ६ वा. वरिष्ठ अग्निशमन कर्मचारी प्रदीप गावंकर यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झाड हटवून परिसर सुरक्षित करण्यात आला. या कारवाईमुळे अंदाजे २० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठे आर्थिक नुकसान झाले नाही. याचदरम्यान वाळपई-होंडा या प्रमुख मार्गावरील होंडा परिसरात रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुमारे दोन तास हा मार्ग बंद राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. यापूर्वी रविवारी रात्री केरी-सत्तरी येथील अंजुणे धरणाजवळ रस्त्यावर तसेच विद्युत खांबावर जंगलातील मोठे झाड कोसळले होते. रात्री १० वाजता माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेनंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
विद्युत खांबाला धोका निर्माण झाल्याने काही काळ वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, वाळपई अग्निशामक दलाने गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी सलग बचाव मोहिमा राबवून रस्ते मोकळे करणे, घरांवर पडलेली झाडे हटविणे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. प्रतिकूल हवामानातही दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्या असून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
झाडे पडण्याच्या घटना वाढल्या; सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक भागांत झाडे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. डोंगराळ भागातील माती सैल झाल्याने मोठी झाडे उन्मळून पडत असून ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. काही भागांत वीजपुरवठाही अधूनमधून खंडित होत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असल्याने सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, वाहनचालक आणि दुर्गम भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, झाडांच्या खाली वाहने उभी करू नयेत, विद्युत तारांच्या संपर्कात आलेल्या झाडांपासून दूर राहावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित अग्निशमन दल, वीज विभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.