सिंधुदुर्ग

Sindhudurg storm news: मध्यरात्री निसर्गाचा कहर; चौकुळच्या म्हार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला

चक्रीवादळासारख्या वाऱ्याने उडाली घरांची छपरे : २४ हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ गावातील म्हार्टवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चक्रीवादळासारखी भीषण परिस्थिती निर्माण केली. काही क्षणांतच अनेक घरांवरील सिमेंटची पत्रे हवेत उडाले, कौलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले. या भयानक परिस्थितीत झोपेत असलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक जीव मुठीत धरून घराबाहेर धावत सुटले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक गरीब कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट अवघ्या काही मिनिटांत मातीमोल झाले आहेत.

२४ हून अधिक कुटुंबांचे अतोनात नुकसान

या भीषण आपत्तीत वाडीतील २४ हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्तवती पांडुरंग नाईक, ज्ञानेश्वर वसंत नाईक, एकनाथ पांडुरंग नाईक आणि तानाजी नाईक यांचे नुकसान झाले.

घराच्या छप्पराची उडाली कौले

वसंत नाईक, कृष्णा पुंडलिक नाईक, संदीप नामदेव नाईक, आनंद नामदेव नाईक, उत्तम लक्ष्मण नाईक, रमेश लक्ष्मण नाईक, परशुराम मारुती नाईक, चंद्रकांत दत्ताराम नाईक, संजय तुकाराम नाईक, मधू मश्नु नाईक, सकाराम मश्नु नाईक, कृष्णा दत्ताराम नाईक, संतोष दत्ताराम नाईक, पांडुरंग दत्ताराम नाईक, बाबू नाईक, सुरेश नाईक, सोम बुधाजी नाईक, यशवंत बुधाजी नाईक, संजय प्रभाकर नाईक, मिरू सखाराम नाईक,

मातीची जुनी घरे जमीनदोस्त; नागरिक उघड्यावर

म्हार्टवाडी-बेरडकीतील बहुतांश घरे ७० ते ८० वर्षे जुनी, मातीची व कौलारू असल्याने या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. आधीच जीर्ण अवस्थेत असलेल्या या घरांची छप्परे उडून गेल्याने अनेक कुटुंबे ऐन पावसाळ्यात उघड्यावर आली आहेत. सध्या आंबोली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, छप्पर गमावलेल्या या नागरिकांसमोर आता राहायचे कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची टांगती तलवार

या वाडीतील बहुतांश नागरिक अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवसाची मजुरी मिळाली तरच घरात चूल पेटते अशी इथल्या कुटुंबांची परिस्थिती आहे. अशा बिकट आर्थिक चक्रात अडकलेल्या या ग्रामस्थांना आपल्या पडलेल्या घरांची दुरुस्ती करणे संपूर्णपणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे शासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आर्थिक मदत, छपरासाठी ताडपत्री, बांधकाम साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी आर्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

ही भीषण घटना घडून अनेक तास उलटून गेले तरी अद्याप एकही शासकीय अधिकारी पंचनामा किंवा परिस्थितीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संकट आमच्यावर कोसळले आहे, डोक्यावरचे छत हिरावले गेले आहे, पण आमचे अश्रू पुसायला आणि मदतीला प्रशासन कधी धावणार? असा संतप्त आणि आर्त सवाल हताश झालेल्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT