

पनवेल: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात अवैद्य पद्धतीने ओव्हरलोडेड गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० मे रोजी रात्री घडली. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार देत सुमारे दीड तास दोन्ही मृतदेह रस्त्यावरच होते.
यावेळी अवैद्य ओव्हरलोडेड गौण खनिज वाहतुक ही पेण उपप्रादेशिक विभाग आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच होत आहे. त्यामुळे महसूल अधिकारी व उप प्रादेशिक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थानकडून करण्यात आली. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास पेण-पनवेल मार्गावरील खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला. डंपर चालकाने मद्यप्राशन करून वाहन अतिवेगाने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकीवरील आदित्य किशोर बल्लाळ वाडकर (वय २२) आणि यश मुकेश बल्लाळ (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत दोघेही मूळचे चिपळूण तालुक्यातील असून सध्या मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास होते.
या घटनेप्रकरणी मृत मुलांपैकी एकाचे वडील मुकेश चंद्रकांत बल्लाळ यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो, मूळ रा. बोकारो (झारखंड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ व १८५ अन्वये c. घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.