रवींद्र खेबुडकर (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Lumpy Virus Outbreak | जिल्ह्यात पुन्हा ‘लम्पी’ची साथ!

Lumpy Disease Vaccination | लसीकरणासाठी 72 हजार डोस उपलब्ध; आतापर्यंत 69 हजार 311 जनावरांचे लसीकरण

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यात वर्षभरानंतर पाळीव जनावरांमध्ये ‘लम्पी’ आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत या आजाराने ग्रस्त 298 जनावरे आढळली असून पैकी 210जनावरे बरी झाली असून 88 जनावरे अजूनही ‘लम्पी’ आजाराने ग्रस्त आहेत. त्यात प्रामुख्याने छोट्या वासरांचा समावेश आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी शेतकर्‍यांनी औषधोपचार व लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभाग एकत्रीकरणामुळे जिल्ह्यात 102 पशुसंवर्धन दवाखाने कार्यरत झाले असून त्यासाठी पदवीधर, पदविकाधारक डॉक्टर आणि एक कर्मचारी देण्यात येत असल्याची माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्गनगरी येथे आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. खेबुडकर म्हणाले, जिल्ह्यात ‘लंपी’ व्हायरस वर्षभरानंतर पुन्हा सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने बाधित 198 जनावरे आढळली आहेत. यात प्रामुख्यांने लहान वासरांचा समावेश आहे. विशेषतः सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले या तालुक्यात‘लंपी’चा प्रादुभार्व जास्त आहे. यापूर्वी सन 202 2-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ‘लंपी’ ची साथ पसरली होती. दरम्यान जिल्ह्यात 72 हजार पाळीव जनावरे असून त्यासाठी शासनाकडून 72 हजारलंपी प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आले आहे.

आता पर्यंत 69 हजार 311 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. खेबुडकर यांनी दिली. पशुपालक शेतकर्‍यांनी या आजारासाठी घाबरून न जाता अशा प्रकारे जनावर आजारी पडल्यास जि. प. पशुसंवर्धन विभागाशी आणि संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधावा. असे आवाहन त्यांनी केले.

पूर्वी बैल जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, मात्र आता यांत्रिकीकरणामुळे बैल व जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे पशुधनांमध्ये घट झाली आहे. परंतु दूध उत्पादन देणार्‍या गाय, म्हैस जनावरांची संख्या वाढली असून दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

दर महिन्याची 15 तारीख ‘अपंग दिवस’ म्हणून पाळणार

दिव्यांग लाभार्थींंसाठीच्या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ या दिव्यांग बांधवांना मिळावा, यासाठी जि. प. दर महिन्याची 15 तारीख ‘अपंग दिवस’ म्हणून पाळणार आहे. अनेक दिव्यांग लाभार्थी काही तांत्रिक त्रुटींमुळे या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत एक बैठक घेऊन आपण आढावा घेतला असून सर्व दिव्यांगांचे प्रश्न प्रत्यक्ष भेटून सोडविले जातील. जास्तीत जास्त अपंगांना लाभ देताना त्यांना प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील 816 आदिवासी लोकांनाही घरे देण्याबाबत आपला प्रयत्न आहे. मालवण मधील कातकरी समाजातील 24 लाभार्थींना घर बांधून देण्यासाठी कुंभारमाठ येथे जागा प्रस्तावित असून त्याचबरोबर जे अपंग लाभार्थी घरापासून वंचित आहेत. अशा कुटुंबांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री.खेबुडकर म्हणाले.

शासकीय कर्मचार्‍यांची सर्व्हिस रेकॉर्ड अपडेट होणार

शासनाने आता 100 दिवसानंतर आता 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमात कर्मचार्‍यांची सर्व्हिस रेकॉर्ड अपडेट करणेबाबत आदेशित केले आहे. 16 सप्टेंबर पर्यंत हा 150 दिवसाचा शासनाचा कार्यक्रम चालणार आहे, त्यासाठी आजच सर्व कर्मचार्‍यांची सर्विस बुके प्रत्येकाच्या हाती देऊन त्यांची वारस व अद्यावतीकरण देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. हे अद्ययावत सर्विस बुक झाल्यानंतर कुटुंब पेन्शन व त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा प्रश्न सुटणार आहे. कर्मचार्‍यांकडून सर्व्हिस बुक प्राप्त होताच सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त सर्व्हिस बुक वर योग्य माहिती आस्थापनाबाबत तपासून त्याची एक झेरॉक्स त्या कर्मचार्‍याकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. खेबुडकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT