Maharashtra and Goa Election 2026  
सिंधुदुर्ग

Maharashtra and Goa Election 2026 | अॅड. असीम सरोदे यांचे आरोप बिनबुडाचे

Maharashtra and Goa Election 2026 | सावंतवाडी वकील संघटनेचे प्रत्युत्तर; वकिलांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न खपवून घेणार नाही

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकील वर्गात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. निर्भय बनो आंदोलनाचे अॅड. आसिम सरोदे यांनी सावंतवाडी वकील संघटनेवर केलेल्या टीकेला जिल्हा बार असो, चे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांनी प्रत्युत्तर दिले, 'सरोदे हे स्वतः उमेदवार नसतानाही राजकीय हेतूने प्रेरित होऊन बेछूट आरोप करत आहेत.

वकिलांचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,' असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संदीप निंबाळकर, अॅड. बी.बी. रणशूर तसेच वकील संघटनेचे पदाधिकारी अॅड. शामराव सावंत, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर, अमोल कविटकर, स्वप्निल कोलगावकर, सुमित सुकी, सिद्धी परब, संकेत नेवगी, अंकुश ठाकूर, राहुल मडगावकर, प्रतीक्षा भिसे, सुशील राजगे आदी उपस्थित होते.

सावंतवाडीत झालेल्या एका सभेदरम्यान अॅड. असीम सरोदे यांनी वकील संघटनेवर आणि २५ सदस्यांवर टीका केली होती. तसेच, निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि वकिलांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर बोलताना अॅड. नाईक म्हणाले, 'सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयावरही गंभीर आरोप केले आहेत.

वकिली स्वातंत्र्याला काही मर्यादा असतात, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असून, याबाबत पोलिस प्रशासन आणि न्यायालयाला रीतसर कल्पना देण्यात आली आहे. यावेळी अॅड. नाईक यांनी बार कौन्सिलचे उमेदवार अॅड. संग्राम देसाई यांच्या कामाची माहिती दिली.

ते म्हणाले, कोल्हापूर येथे खंडपीठाची निर्मितीः मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या सहकायनि अवघ्या २२ दिवसांत खंडपीठाची इमारत पूर्ण करण्यात आली. तळोजा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने तंत्रज्ञानावर आधारित रिसर्च सेंटर केवळ १ रुपया नाममात्र दराने उपलब्ध करून दिले आहे, ज्याचा फायदा ज्युनिअर वकिलांना होत आहे. शिवाय वकील संरक्षण कायदा कडक करतांना वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी विशेष कायदा करण्यात संग्राम देसाई यांचा मोठा वाटा आहे.

सध्याची निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत असून, यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देखरेख करत आहेत. १९ फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू झाली असून के. श्रीराम यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 'जादा फी घेण्याचा कोणताही प्रश्न नाही,' असेही अॅड. नाईक यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक २४ मार्च रोजी होत आहे.

चळवळ बदनाम होत आहे

आम्ही 'निर्भय बनों'च्या अनेक सभा घेतल्या आहेत; मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यात सरोदे यांना काय रस आहे? अशाने चळवळ बदनाम होत आहे,' अशी टीका अॅड. संदीप निंबाळकर यांनी केली. अॅड.बी.बी. रणशूर यांनी स्पष्ट केले की, सावंतवाडी वकील संघटनेकडे सभेसाठी कोणताही अधिकृत अर्ज आला नव्हता, संघटना सर्व सदस्यांच्या संमतीनेच निर्णय घेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT