गुहागर, पुढारी वृत्तसेवा : मी खासदार झाल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी समाज भवनाला ५ कोटी मिळवून दिले. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने परत ७.५० कोटी दिले. मात्र खासदार म्हणून अनंत गीतेंनी एक रुपयाची मदत केली नाही. त्यांनी समाजासाठी कोणते भरीव काम केले ते जाहीरपणे सांगावे, असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.
आज शृंगारतळी पालपेणे रोड येथील भवानी सभागृहात महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू गुहागर, प्रशांत शिरगावकर, मधुकर चव्हाण, नीलम गोंधळी, रामदास राणे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, अजय बिरवाडकर, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, साहिल आरेकर, राजेश बेंडल, प्रदीप बेंडल, संदीप राजपुरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, नीलेश मोरे, सचिव संतोष आग्रे, शरद शिगवण यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार म्हणून निवडून आल्यावर मुंबई-गोवा महामार्ग, सागरी महामार्ग, ग्रीनफिल्ड हायवे, मच्छीमारांना सुविधा देणे, रोजगार निर्मिती, आरोग्यविषयक सेवांची उपलब्धता, सीआरझेड समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहे. महायुतीचा खासदार म्हणून सातत्याने आपल्या संपर्कात राहून केंद्रातील विषयांचा पाठपुरावा करेन, असे आश्वासन यावेळी सुनील तटकरे यांनी दिले.
तसेच ही लढाई सत्तेची नाही, सत्याची आहे. देशाच्या सार्वभौमत्व व एकात्मता टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. नेतृत्व करताना पंतप्रधान मोदींनी सर्व स्तरावर देशाला पुढे नेण्याचे काम केले. या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज विरोधक खालच्या पातळीवर येऊन मोदींवर, महायुतीवर व माझ्यावर टीका करत आहेत. मात्र टीका करताना आपण यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो हे विसरतात. १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी कुणबी समाजासाठी भुखंड दिला. तेव्हापासून या समाजाच्या मतांवर ६ वेळा जिंकून येणाऱ्या केंद्र सरकारमध्ये दोन वेळा मंत्री असणाऱ्या गीतेंनी काहीही केले नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा :