राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ओणी-अणुस्कुरा मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पार्वती तानू तरळ (रा. शिवणे बुद्रुक) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार हे आपल्या क्रेटा गाडीने (एमएच 14, एमएल 9618) पुण्याहून कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या गाडीत लहान मुले व इतर कुटुंबीय असे प्रवासी होते. रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची गाडी आली असता, पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने कारला मागून धडक दिली. या अनपेक्षित धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक (एमएच 08, एक्यू 7266) तेथून जात होता. रस्त्यावर पडलेल्या पार्वती या या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या. चाकाखाली चिरडडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक संतोष सिद्धार्थ सावंत हा रत्नागिरीहून मालवाहतूक करत होता.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आणि रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.अपघाताच्या वेळी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी रवींद्र पांचाळ आणि गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण उपस्थित होते.