रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलाकडून सन २०१९ ते सन २०२६ या कालावधीत दाखल असलेल्या ११ एन.डी.पी.एस गुन्ह्यातील तब्बल 90 लाखांचे विविध अमली पदार्थ शनिवार ४ जुलै रोजी तळोजा, नवी मुंबई येथे नष्ट करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे असून या समितीच्या सदस्य हे अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी व पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके आहेत. अध्यक्ष नितीन बगाटे यांनी रत्नागिरी घटकामध्ये एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांना निर्देश दिले होते.
त्यानुसार, गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ११ एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्ह्यांतील मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले. व त्याप्रमाणे नमूद गुन्ह्यांतील मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून हा मुद्देमाल एम.डब्ल्यू.एम.आय तळोजा, नवी मुंबई येथे नाश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.
त्याप्रमाणे ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने हा मुद्देमाल यशस्वीरित्या नष्ट केला. या मध्ये गांजा १० किलो ४९ ग्रॅम ५ मिलीग्रॅम, गांजा रोपे ४३, चरस ९ किलो ७८ ग्रॅम, कोकेन १२६ ग्रॅम असा एकूण २० किलो ५३ ग्रॅम ५ मिलीग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आला.