Ratnagiri News
रत्नागिरी: "देव तारी त्याला कोण मारी" आणि "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" या म्हणींचा जिवंत प्रत्यय रत्नागिरीतील लांजा येथे नुकताच पाहायला मिळाला. एका गतिमंदाच्या केबिनमधील अचानक झालेल्या प्रवेशामुळे तीन परप्रांतीय तरुणांचे प्राण थोडक्यात वाचले, मात्र दुर्दैवाने या घटनेत अज्ञात गतीमंद व्यक्तीचा दरडीखाली चिरडून मृत्यू झाला.
लांजा जवळील वाकेड येथील एका पेट्रोल पंपाच्या ऑफिस केबिनमध्ये शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पाऊस सुरू असताना, या केबिनमध्ये बिहार राज्यातील तीन तरुण कामगार बसले होते. अचानक एक विवस्त्र गतिमंद व्यक्ती केबिनमध्ये घुसला. त्याला पाहून घाबरलेल्या या तिन्ही तरुणांनी तातडीने केबिनमधून बाहेर धाव घेतली.
तरुण केबिनमधून बाहेर पडतात न पडतात, तोच एका प्रचंड आवाजासह पाठीमागील डोंगराची भलीमोठी दरड थेट ऑफिस केबिनवर कोसळली. केवळ काही सेकंदांचा अवधी मिळाला नसता, तर हे तिन्ही युवक त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असते. आपल्या डोळ्यादेखत केबिन जमीनदोस्त झालेली पाहून तरुणांना काय घडले हे क्षणभर समजलेच नाही. त्यांनी अत्यंत भीतीच्या वातावरणात शेजारील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रसंग सांगताना हे तरुण थरथर कापत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा मोठा असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चार जेसीबी, एक लोडर आणि एका पोकलेन मशीनच्या साहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. रात्रीपासून सुरू असलेली ही शोधमोहीम जवळपास नऊ तासांनंतर, म्हणजे पहाटे साडेचार वाजता संपली. या शोधमोहिमेदरम्यान केबिनमध्ये अडकलेल्या अज्ञात गतिमंद व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.