रत्नागिरी : यंदा गुढीपाडव्याच्या तोंडावर वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी पेट्या बाजारात दाखल झाल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. खराब हवामानाचा दुहेरी फटका बागायतदारांसह ग्राहकांनाही बसला आहे.
गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये तब्बल ४० हजार आंबा पेट्यांची आवक झाली होती. मात्र यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. केवळ १३ हजार पेट्याच बाजारात दाखल झाल्या. आवक कमी झाल्याने हापूसच्या एका पेटीचा दर थेट ५ ते १० हजारांपर्यंत पोहोचला आहे. उच्च दर्जाच्या हापूसला तब्बल १२ हजारांपर्यंत भाव मिळत असल्याचे हा दर विक्रमी मानला जात आहे.
फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आणण्याचे नियोजन दरवर्षी बागायतदार करत असतात. मात्र यंदा सातत्याने बदलणारे हवामान, अवेळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळाले नाही. परिणामी बाजारातील आवक लक्षणीयरित्या घटली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी आंबा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बागायतदारांनी गेल्या काही दिवसांत काढणीला वेग दिला. १८ मार्च रोजी सुमारे ५ हजार पेट्या, तर गुरुवारी १० हजार पेट्यांची आवक वाशी मार्केटमध्ये झाली. तरीही ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
केवळ मुंबईतच नव्हे, तर रत्नागिरीसह कोकणातील स्थानिक बाजारपेठेतही हापूसचे दर प्रचंड वाढले आहेत. स्थानिक बाजारात एका डझनला ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी आंबा खरेदी करणे कठीण झाले आहे.
गुढीपाडवा आणि उन्हाळा म्हटले की हापूस आंब्याची चव घेणे हा अनेकांचा परंपरागत आनंद असतो. मात्र यंदा वाढलेल्या दरांमुळे सामान्य ग्राहकांचा हा आनंद हिरावला गेला आहे. "दर इतके जास्त आहेत की, यंदा आंबा खाण्याचा विचारही करणे कठीण झाले आहे," अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहक देत आहेत.
आवक कमी असल्याने दर वाढले असले तरी याचा फायदा सर्वच बागायतदारांना होत नाही. उत्पादन घटल्यामुळे एकूण उत्पन्न कमी होत असून खर्चाच्या तुलनेत अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत बागायतदार व्यक्त करत आहेत. हवामान अनुकूल राहिल्यास पुढील काही आठवड्यांत आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत दर लवकर खाली येण्याची शक्यता कमी असल्याचेच बहुतांश आंबा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हापूस आंब्याच्या घटलेल्या आवक आणि वाढलेल्या दरामुळे यंदाचा आंबा हंगाम सर्वसामान्यांसाठी कडू ठरत आहे. हवामानातील बदलांचा थेट परिणाम शेती आणि बाजारपेठेवर होत असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे.