खेड : "महायुतीतील काही मंत्र्यांवर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहेत का?" असा संशय शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. रविवारी (ता. २७) खेड येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
“फक्त आरोप करून राजीनाम्याची मागणी करणे ही योग्य पद्धत नाही. शिंदे साहेबांवरील हे हल्ले नियोजित कटाचा भाग वाटत आहेत,” असे म्हणत कदम यांनी आपल्या शैलीत ठाम भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आमदार अनिल परब यांच्यावरही बोचरी टीका केली. “आपला तरुण आमदार मंत्री झाला तर त्याच्यावरच आरोपांची झोड उठवायची, हे कुठल्या राजकारणात बसतं? जगात असा नेता असेल जो आपल्या माणसालाच संपवतो, तर तो फक्त उद्धव ठाकरेच असू शकतो,” अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“कोकण हा बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि तो आजही भगव्याच्याच बाजूने आहे. आगामी निवडणुकांतही कोकणात भगवाच फडकणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला