खेड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची तसेच जिवीतहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर घाटात दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. तसेच डांबरी रस्त्याचा पृष्ठभाग आणि साईडपट्टी मोठ्या प्रमाणात खचली असून अनेक ठिकाणी माती व दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे डांबरी रस्त्याला तडे जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यटकांना घाटातील पर्यटन स्थळांवर थांबण्यास तसेच सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या जड वाहनांनाही या मार्गावरून वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेसना या मार्गाने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना आदेशाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.