अजित सावंत
सिंधुदुर्ग: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे सिंधुदुर्गातील घाट रस्ते गेल्या २५ वर्षांत कोट्यवधी रूपये खर्च करून दुरूस्त करण्यात आले. काहींचे नूतनीकरणही करण्यात आले. तरीही पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
त्यामुळे पावसाळ्यात घाट मार्गातून प्रवास करताना वाहनचालकांची सतर्कता तेवढी कामी येते. सिंधुदुर्गातील पाच घाट रस्त्यांपैकी गगनबावडा-करूळ घाटाचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले. तर इतर घाट रस्ते नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.
तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना गतवर्षी करूळ-गगनबावडा या घाटमार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आला असून, अनेक धोकादायक दरडी काढण्यात आल्या.
नागमोडी वळणे कमी करण्यात आली. संरक्षक कठडे बांधले, परंतु दरडींचा धोका पूर्णत: टळलेला नाही. संरक्षक कठड्यांची कामे काही प्रमाणात तकलादू झाली आहेत. एकुणच हा घाटमार्ग वाहतुकीसाठी सुसाट झाला असला तरी पावसाळ्यात संभाव्य दरडींचा धोका लक्षात घेऊन वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागणार आहेत.
दुसरीकडे करूळ घाटमार्गाला पर्याय असलेला भुईबावडा घाटमार्ग यंदाही धोकादायक स्थितीत आहे. कोणत्याही क्षणी कोसळतील अशा दरडी, कमकुवत झालेले संरक्षक कठडे शिवाय या घाटमार्गाला रस्ता खचण्याचाही धोका आहे.
अतिपावसामुळे आंबोली घाटातही धोका
तीन राज्यांना दक्षिण कोकणशी जोडणारा ब्रिटीशकालीन आंबोली घाटमार्ग पावसाळ्यातील वाहतुकीसाठी सज्ज झाला असला तरी या घाटमार्ग परिसरात दरवर्षी ३०० इंचापेक्षा जास्त पाऊस पडत असल्यामुळे हा घाट मार्गही काहीसा धोकादायक ठरत आहे.
बांदा-संकेश्वर या राष्ट्रीय महामार्गामुळे आंबोली घाटमार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला. गत दोन वर्षात या घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात दरडी कोसळतात.
अपघातांचा घाट तिलारी, फोंडा काहीसा सुरक्षित
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी हा घाटमार्ग नागमोडी वळणांमुळे धोकादायक बनला आहे. वाहतुकीस हा रस्ता सुरक्षित असला तरी नागमोडी वळणांमुळे तिलारी घाटात सातत्याने अपघात होतात हेही वास्तव आहे.
जिल्ह्यातील पाच घाट रस्त्यांपैकी सर्वात सुरक्षित म्हणून कणकवली तालुक्यातील फोंडाघाट या घाटमार्गाची ओळख आहे. या घाटमार्गाच्या दुरूस्तीवरही गेल्या २५ वर्षात कोट्यवधीचा खर्च झाला आहे. धोकादायक दरडी हटविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे फारशा दरडी या घाटात कोसळत नाहीत. परंतु धोकादायक कठडे, अर्धवट गटारांची कामे या घाटात पहायला मिळतात. सध्या ही कामे पावसाळा सुरू झाला तरी सुरू आहेत. त्यामुळे डोंगराचे पाणी रस्त्यावर येवून रस्ते निसरडे होण्याबरोबरच अपघातांना निमंत्रण देणारे ठरणार आहे.