लांजा : पावसाने दहा ते पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे भातशेती गारठली तर मध्येच पडणाऱ्या कडक उन्हामुळे लांजा तालुक्यातील काही भागातील भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. वारंवार बदलत्या हवामानाचा फटका भातशेतीवर दिसून येत आहे.
भात लागवड झाल्यापासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यानंतर काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. मध्येच उन्हामुळे उष्णता या साऱ्याचा परिणाम भातशेतीवर दिसू लागला आहे. लांजा तालुक्यातील अनेक भागांमध्ये भात रोपांवर करपा रोग पसरला असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. हवामानाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. नुकसानीची परिस्थिती उद्भवते आहे.
सध्या भातपिकाची प्रसवण प्रक्रिया सुरू असून तालुक्यात भातपिकांवर करपा रोगाचे संकट आले आहे. या रोगामुळे भात पीकाच्या संपूर्ण पाती मुळासकट लाल, तांबड्या पडत असून रोपे जळून जात आहेत. या रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. उपाययोजना न केल्यास भातपिकाच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे हाताशी आलेले भातपीक नष्ट होण्याची शक्यता आहे अशी भीती शेतकरी वर्गामध्ये पसरली आहे.
तालुक्यातील वेरवली बुद्रुक गुरववाडी मध्ये शेतकऱ्यांच्या भातपिकांवर करपाजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतावर प्रत्यक्ष जाऊन पंचायत समिती कृषी व तालुका कृषी विभागाने प्रतिबंधात्मक औषध फवारणी व औषध उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच, शेतकऱ्यांशी संपर्क साधून, चर्चा करून भातपिकाची पाहणी करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक गुराववाडी व अन्य वाड्यांमध्ये भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.