खेड : पुढारी वृत्तसेवा : सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिलीप खेडकर यांची कोकणातील कारकीर्द देखील वादात सापडलेली आहे. खेडकरांचे हेडक्वार्टर नेहमीच खेड असायचे. माजी पर्यावरण मंत्र्यांच्या गावात खेडकरांच्या बैठका चालायच्या. त्यांच्या इच्छेनुसार कंपन्यांना क्लोजरच्या नोटिसा दिल्या जायच्या, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी आज (दि.१९) केला. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची देखील एसीबीने चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केली आहे.
वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर सध्या चर्चेत आले आहेत प्रसिद्ध वकील तानाजी गंभीरे यांनी दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. त्याचबरोबर वकील गंभीरे यांनी कोकणातील दोन मंत्र्यांची नावे घेऊन त्यांच्या बदलीसाठी कोट्यावधी रुपये घेतल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे.
तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनासारखे बदली करण्यासाठी दोन कोटी रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कदम म्हणाले की, सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची देखील दिलीप खेडकर यांच्यासोबत एसीबीने चौकशी करावी. दिलीप खेडकर हे कोल्हापूर विभागात प्रादेशिक अधिकारी म्हणून काम करत असताना तसेच राज्यात इतरत्र काम करत असताना त्यांनी किती कंपन्यांना क्लोजरची नोटीस दिली. व त्यांच्यापुढे काय झाले. याची देखील चौकशी एसीबीने करावी. क्लोजरचे नोटीस दिल्यानंतर पुढे काय झाले. तडजोडी झाल्या की, कारवाई झाली याची माहिती घ्यावी, त्या कालावधीमध्ये केवळ कंपन्यांच नाही. तर कात कारखाने आणि क्रशर यांना सुद्धा खेडकर यांनी नोटिसा देऊन मोठ्या प्रमाणावर माया जमा केली व जमा करून दिली आहे.
कोल्हापूर विभागात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी असताना दिलीप खेडकर यांची कारकीर्द देखील वादग्रस्त होती. त्यांच्या बैठका या पर्यावरण मंत्र्यांचे गाव असलेल्या खेडमध्ये व्हायच्या. रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य सेवा संस्थेला आर्थिक फंड त्या कालावधीत किती आला. याची देखील एसीबीने चौकशी करावी. आपण या संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले.
रामदास कदम हे तानाजी गंभीरे यांच्यावर आपण आब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगत आहेत. व दिलीप खेडकर यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, आपण त्यांना केवळ कामापुरते ओळखतो, असे प्रसार माध्यमांना त्यांनी सांगितले आहे. दिलीप खेडकर याने लोटे एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांना नोटिसा दिल्या. व त्यामध्ये पुढे काय कारवाई झाली, याचा देखील तपास एसीबी कडून होणे गरजेचे आहे. आपल्या अंगावर एकही डाग लावू दिला नाही, असे म्हणणारे रामदास कदम एसीबीच्या चौकशीला का घाबरत आहेत, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, असे डायलॉग मारणाऱ्यांनी चौकशी कराच, असं म्हटलं पाहिजे. दिलीप खेडकर आणि रामदास कदम यांचे चांगले संबंध होते हे कोकणात देखील सर्व उद्योजकांना चांगलं माहित आहे. त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी रामदास कदम यांची देखील एसीबीने चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.