दापोली : प्रवीण शिंदे
दापोली तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी ढासळल्याने ७ कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या संवर्धनाच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समुद्रकिनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून, कोकणच्या सागरी इतिहासाचा तो एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगड-मातीची वास्तू नसून, स्वराज्याच्या वैभवाचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. शेकडो वर्षे वादळ-वारे, पाऊस आणि नैसर्गिक संकटांचा सामना करूनही हे किल्ले ताठ मानेने उभे राहिले. मात्र, आधुनिक काळात संवर्धनाच्या नावाखाली ७ कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही काही वर्षांतच तटबंदी ढासळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे.
गोवा किल्ल्याच्या तटबंदीची काही भाग कोसळल्याने इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संवर्धनासाठी नेमका किती निधी खर्च झाला, कामे कोणत्या दर्जाची करण्यात आली आणि त्यावर तांत्रिक देखरेख कितपत ठेवण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कोकणातील किल्ले हे राज्याच्या पर्यटन, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे अनमोल दालन आहे. अशा ऐतिहासिकस्तूंच्या जतनासाठी शासन मोठा निधी उपलब्ध करून देत असताना प्रत्यक्षात त्यांची दुरवस्था होत असेल, तर हा केवळ निधीचा अपव्यय नसून इतिहासाशी केलेली प्रतारणा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गोवा किल्ल्याची ढासळलेली तटबंदी ही केवळ एका भिंतीची पडझड नसून, ऐतिहासिक वारशाच्या संवर्धन व्यवस्थेतील त्रुटींचे प्रतीक असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.