चिपळूण शहर : पुढारी वृत्तसेवा
चिपळूण तालुक्यातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येबाबत आमदार शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी आमदार निकम यांना पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे चिपळूण तालुक्यातील तिवडी, वेहेळे, तळवडे आणि अनारी या चार गावांचा डिजिटल भारत निधी (डीबीएन) अंतर्गत सुरू असलेल्या ४जी सॅच्युरेशन प्रोजेक्टमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती दिली.
यापूर्वी आमदार शेखर निकम यांनी केंद्र सरकारकडे चिपळूण तालुक्यातील मोबाईल नेटवर्क आणि ५जी सेवेअभावी नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा मुद्दा प्रभावीपणे मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने या विषयाची सविस्तर पडताळणी केली.
मंत्रालयाच्या पत्रानुसार, चिपळूण तालुक्यातील या चार गावांमध्ये अद्याप ४जी सेवा उपलब्ध नसल्याने त्यांचा समावेश सुरू असलेल्या ४जी सॅच्युरेशन प्रकल्पात करण्यात आला आहे.
तसेच, तालुक्यातील १६७ गावांपैकी ९७ गावांमध्ये ५जी सेवा उपलब्ध असून उर्वरित भागातही टप्प्याटप्प्याने सेवा विस्ताराची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा, ऑनलाईन शिक्षण, डिजिटल व्यवहार आणि शासकीय सेवांचा अधिक प्रभावी लाभ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत होत असून ग्रामीण भागाच्या डिजिटल विकासाला यामुळे निश्चितच गती मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.