चिपळूण शहर : सुनील दाभोळे
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर आता कोकणातील जलपर्यटनाचे नवे आकर्षण ठरत आहे. वाशिष्ठी नदीच्या खाडीत अत्याधुनिक हाऊसबोट सफरीची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांना केरळसारखा बॅकवॉटर अनुभव घेता येणार आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरीने महिला बचत गटांना चालना देण्यासाठी हाऊसबोटी उपलब्ध करून दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांमुळे चिपळूणसाठी दोन अत्याधुनिक हाऊसबोटी मिळाल्या. वर्षभर धक्क्यावर थांबलेल्या या बोटी अखेर पर्यटकांसाठी खुल्या झाल्या असून गोवळकोट-वाशिष्ठी खाडीत जलपर्यटनाची सुरुवात झाली आहे. या हाऊसबोटी केवळ प्रवासाचे साधन नाहीत तर एक चलनशील निवास व्यवस्था आहेत.
दोन वातानुकूलित शयनकक्ष, आधुनिक वॉशरूम, संगीत कार्यक्रमासाठी डेक, स्वतंत्र भोजन कक्ष, कोकणी व्हेज-नॉनव्हेज भोजनाचा आस्वाद घेण्याची सुविधा आहे. तीन ते बावीस तासांच्या सफरीसाठी ग्रुप टूरची सोय असून दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश आहे.
गोवळकोट धक्का ते दाभोळ खाडीपर्यंतच्या सफरीत पर्यटकांना कोकणाचा खरा चेहरा दिसतो. हिरव्यागार आंबा, काजू, नारळाच्या बागा, आकर्षक बंगले, पारंपरिक मच्छीमार व्यवसाय, कांदळवने, मगरी, रंगीबेरंगी पक्षी आणि मासे हे सर्व अनुभव पर्यटकांना मोहून टाकतात.
दिवा बेटातील सात विहिरी, जंगलातील पशु-पक्ष्यांचे दर्शन फरीला ऐतिहासिक व नैसर्गिक परिमाण देतात. या उपक्रमामुळे स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळते, स्थानिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन मिळते. कोकणातील पर्यटनाला नवा आयाम मिळतो.
केरळप्रमाणेच कोकणातही बॅकवॉटर पर्यटनाला मोठी पसंती मिळत असून, चिपळूणचे हे बॅकवॉटर पर्यटन राज्याबाहेरील पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. चिपळूणचे बॅकवॉटर पर्यटन हे आधुनिक सुविधा आणि पारंपरिक निसर्गसौंदर्य यांचा संगम ठरत असून, कोकणाच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
राज्यभरातील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद...
मिरजोळी गावचे पोलिसपाटील व हाऊसबोटीचे व्यवस्थापन करणारे दिलावर खडपोलकर यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी चिपळूणसाठी हाऊसबोट उपलब्ध झाली. मात्र, काही किरकोळ अंतर्गत सुविधा व चाचणी देण्यासाठी प्रत्यक्ष बॅकवॉटर पर्यटनाला कालावधी लागला असला तरी हाऊसबोट सुरू झाल्यापासून पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भरती आणि ओहोटीचा काही कालावधी सोडल्यास दाभोळपासून थेट गोवळकोटपर्यंत सुरक्षित जलपर्यटनाचा आनंद पर्यटकांना अनुभवता येत असल्याने समाधान मिळत आहे. या जलपर्यटनाला राज्यभरातील पर्यटकांचा मोठा प्रतिसादही लाभत आहे.