

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत. अनेक छोटी हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काहींनी चुलीचा आधार घेतला आहे.
मात्र, मोठ्या हॉटेल्सना हा पर्याय परवडणारा नसल्याने त्यांनी थेट हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
यामध्ये सामंत यांनी प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. ज्या हॉटेलना शक्य आहे त्यांना तातडीने महानगर गॅसची पाईपलाईन जोडणी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी नगरपालिका प्रशासन आणि महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सर्वेक्षण करावे, असे निर्देश दिले आहेत.
प्रांताधिकाऱ्यांवर वितरणाची जबाबदारी
व्यावसायिक सिलिंडर वितरणाबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. गॅस एजन्सीतील शिल्लक साठा विचारात घेऊन प्राधान्य क्रमानुसार वितरण करावयाचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.