कोकण

maharashtra rain news : मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांचा नाराजीचा सूर

backup backup

चिपळूण; पुढारी ऑनलाईन : maharashtra rain news : पावसाच्या रौद्ररुपात चिपळूणचे सर्वांधिक नुकसान झाले आहे. संपूर्ण शहराला पाण्याने वेढा दिल्याने जिवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या सर्व भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणला भेट घेऊन पाहणी केली.

मुख्यमंत्री यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव,आदी उपस्थित होते..

 चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. स्थानिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करताना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. अनेकांना भावना अनावर झाल्याचे दिसून आले.

"तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा", अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला.

अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. "आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा", असा टाहोच एका महिलेने फोडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

काही व्यापाऱ्यांनी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील ९ जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुराच्या प्रचंड विळख्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, मुंबई, उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे, या ९ जिल्ह्यात महापुराचा विळखा मोठ्या प्रमाणात बसला आहे.

राज्यात maharashtra rain news अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ६० हून अधिक जखमी झाले.

दरड दुर्घटना आणि पुरात बेपत्ता असलेल्या सुमारे शंभराहून अधिक नागरिकांचा शोध सुरूच आहे. एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांधिक भीषण परिस्थिती चिपळूण तालुक्यात झाली आहे. होत्याचे नव्हते झाले अशी परिस्थिती प्रलयकारी पावसाने करून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणसाठी रवाना झाले आहेत. ते चिपळूणमधील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा आज कोकणात आहेत. नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या साथीत पुरस्थितीची पाहणी करणार आहेत.

maharashtra rain news :  तळईत 42 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात यश

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई गावातील दरडीखालील 42 मृतदेह
आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. 43 जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दुर्घटना झाली त्यावेळी गावांत एकूण 35 घरांत 106 ग्रामस्थ होते.

यापैकी 15 जण सुखरुप बाहेर पडले, तर 6 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळपर्यंतच्या माहितीनुसार राज्यातील ठिकठिकाणच्या दुर्घटनांमधील 82 मृतदेह हाती आले असून अद्याप 59 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

त्या बाजूला गेलेले दरडीखाली सापडले. त्यातील 15 लोक विरुद्ध दिशेने पळाल्याने ते बचावले. मात्र घरात अडकलेली लहान मुले, महिला व वयोवृद्ध ग्रामस्थ दरडीखाली सापडले.

डोंगराचा जवळजवळ निम्मा भाग तुटून घरांवर आदळला आणि काही समजण्याच्या आतच सर्व ढिगार्‍याखाली गाडले गेले. शनिवारी
सापडलेल्या मृतदेहांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे.

शनिवारी दिवसभराच्या शोधमोहिमेत 8 मृतदेह सापडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

maharashtra rain news  : लष्कर, नौदलाचीही मदत

राज्यातील पूरग्रस्त भागात सध्या एनडीआरएफची 17 पथके तैनात आहेत. याशिवाय आणखी 8 पथके भुवनेश्‍वरहून मागवण्यात आली
आहेत. सध्या एनडीआरएफची पथके ठाण्यात दोन, पालघरमध्ये एक, कोल्हापुरात चार आणि रत्नागिरीत सहा कार्यरत आहेत.

रायगडमध्ये एक, सांगलीत दोन, सातार्‍यात तीन, मुंबईत दोन, सिंधुदुर्गमध्ये दोन, पुण्यात दोन राखीव अशी एनडीआरएफची 25 पथके तैनात आहेत.

महापुराचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कराचे एक पथक, नौदलाची पाच पथके, सीमा सुरक्षा दलाची दोन पथके, हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कोल्हापूर व रत्नागिरीत तैनात करण्यात आली आहेत.

सांगलीतही लष्कराचे एक पथक दाखल झालेले आहे. रायगडमध्ये नौदलाची दोन आणि सीमा सुरक्षा दलाचे एक तशी तीन पथके दाखल आहेत. वरील फौजफाट्याशिवाय रविवारपासून एनडीआरएफची आणखी आठ पथके मागवण्यात आली आहेत.

कोल्हापुरात दोन, सातार्‍यात एक, सांगलीत दोन, पुण्यात तीन (राखीव) पाठवली जातील.

हे ही वाचलं का? 

PHOTOS : मराठी अभिनेत्री कार्टून लुकमध्ये कशा दिसतील?

[visual_portfolio id="11817"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT