संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील शिबलापूर-पानोडी रस्त्यापासून पुर्वेकडे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलदर्यातील पाबळ वस्तीवर एका शेतकर्याच्या तीन शेळ्या, दोन बोकड, दोन पाठींवर अंधारा फायदा घेऊन बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले.
श्यामराव कारभारी पाबळ यांच्या लहान-मोठ्या अशा सात शेळ्या बिबट्याच्या शिकार ठरल्या आहेत. त्यांच्या या शेळ्या घराशेजारील सात फुटी जाळीच्या कंपाउंडमध्ये सुरक्षित होत्या. मात्र, रविवारी रात्रभर पाऊस सुरू असल्याने वीज गेली. यानंतर बिबट्याने अंधाराचा फायदा घेत शेजारील बाथरुमच्या पत्र्याच्या सापटीमधून ज्या ठिकाणी शेळ्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी प्रवेश केला.
श्यामराव यांना सकाळी जाग आल्यानंतर शेडमधील दृश्य बघून त्यांना हादराच बसला. बिबट्याने सात शेळ्यांची शिकार केल्याची वार्ता शेजारील रहिवाश्यांसह परिसरात समजल्याने श्यामराव यांच्या घराकडे लोक धाव घेवू लागले. या गरीब शेतकर्याच्या सात शेळ्या बिबट्याने ठार केल्याने या शेतकर्यास अश्रू अनावर झाले होते.