अहमदनगर

नगर : कोटमारातील शेतकर्‍यांच्या मोटारी चोरीला

अमृता चौगुले

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागात आंबी दुमाला गावाजवळ असलेले कोटमारा धरणातून मंगळवारी (दि. 28) रोजी रात्रीच्या वेळेस अनेक शेतकर्‍यांच्या मोटारी, केबल, स्टार्टर चोरी गेल्याची घटना घडली आहे.

आंबी दुमाला गावातील अनेक शेतकर्‍यांच्या कोटमारा धरणावर शेतीसाठी पाणी सिंचन करणार्‍या मोटारी आहेत. काही शेतकर्‍याच्या पाणबुडी मोटारी आहे, तर काहींच्या पाण्याबाहेरील पाणी सिंचन मोटारी आहे. अनेक शेतकर्‍यांनी कित्येक किलोमीटरवर पाईपलाईन करून आपल्या शेतीसाठी कोटमारा धरणातून पाणी नेले आहे. या धरणाजवळ लोक वस्ती तुरळक आहे. मंगळवारी रात्री लाईट नसल्याने कोणी शेतकरी आपल्या मोटारी चालू करण्यासाठी धरणावर आले नाहीत. याच संधीचा फायदा उठवत भुरट्या चोरांनी या धरणावरील शेतकर्‍याच्या मोटारी काढून, केबली कापून, स्टार्टर काढत चोरून लंपास केले असल्याची घटना घडली असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

आंबी दुमाला गावातील रंगनाथ राखुंडे, सुरेश हांडे, विष्णू भगवंता ढेरंगे, बाळू विठ्ठल ढेरंगे, विलास नाथा नरवडे, सदू शेळके,भाऊ विठ्ठल ढेरंगे, हरिचंद्र ढेरंगे, विठ्ठल राखुंडे अशा शेतकर्‍यांच्या दहा मोटारी, तसेच तसेच तीन हजार फूट कॉपर केबल, स्टार्टर असा तीन लाखांपर्यंतचा मुद्देमाल गुंडाळून चोरांनी पोबारा केला असल्याची माहिती सरपंच जालिंदर गागरे यांनी दिली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतकर्‍यांची पेरणी चालू असल्याने शेतकरी धरणाकडे फिरकत नसल्याचे औचित्य साधत चोरांनी मोठी धाडसी चोरी केली आहे. शेतकर्‍यांच्या मोटारी, केबली, स्टार्टर चोरी जाण्याच्या घटना वारंवार घडत आहे. यावेळी घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत चोरट्यांना लवकरच शोध घेऊ, अशी ग्वाही यावेळी दिली.

SCROLL FOR NEXT