जवळा : पुढारी वृत्तसेवा : कुकडी कालव्यातून ओढ्याला पाणी सोडल्याने जवळा- सांगवी -पारनेर या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असून, तात्पुरत्या स्वरुपाचा पर्यायी रस्ता पाण्यात वाहून गेल्याने या गावांचा तालुक्याशी असलेल संर्पक तुटला आहे. पाण्याचा दाब जास्त असल्याने नागरिकांना ये-जाही करता येत नाही. पाटाच्याकडेला असलेल्या कच्चा रस्त्याने जीव मुठीतधरून प्रवास करावा लागत आहे. तर, दुसरीकडे पाटबंधारे विभागाने या रस्त्यावरून नागरिकांना प्रवासासाठी मज्जाव केला आहे. त्यामुळे नागरिकांची ही वाट आता बिकट झाली आहे.
जवळा (ता. पारनेर) येथील जवळा – सांगवी – पारनेर तालुक्याच्या रस्त्यावरील सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम सुरू आहे; परंतु हे काम कित्तेक महिन्यापसून रेंगाळलेले आहे. पुलाच्या कामात ठेकेदाराने गलथान कारभार करत वेळेत काम पूर्ण केलेले नाही. कुकडी कालव्याच्या अवर्तनाने सिद्धेश्वर ओढ्याला सोडलेल्या पाण्याच्या उच्च दाबाच्या प्रवाहाने कंत्राटदाराने तात्पुरता काम चालू असलेल्या जागेपासून पर्यायी रस्ताच वाहून गेला आहे. यामुळे तीन ते चार दिवसांपासून दळणवळण बंद झाले आहे.
तालुक्याला जोडणारा व मोठ्या वाहतुकीचा रस्ता अचानक पूर्ण बंद झाल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे. यामुळे नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. ही थांबवण्यासाठी दुथडी भरून वाहणार्या कुकडी कालव्याच्या बाजूने धोकादायक रस्त्याने वाहतूक वळविली; परंतु हा रस्ता वाहतुकीच्या द़ृष्टीने नागरिकांच्या जीवावर बेतनारा असल्याने पाटबंधारे विभागाने काल गावात येऊन या रस्त्याने जाण्यास नागरिकांना मज्जाव केला. तसेच, कोणी ही सूजना ऐकली नाही, तर थेट कारवाई करणार असल्याचे सांगितले.
अवजड वाहतूक करू नये, अशी भूमिका घेतली असल्याने परिसरातील नागरिकांना 'कुणी रस्ता, देता का? रस्ता' अशी म्हणण्याची वेळ आली. याचा ग्रामस्थ, विद्यार्थी, नागरिकांना मनस्ताप होत आहे. एसटी सेवा बंद झाली आहे.
याबाबत आवाज उठवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्याला फोनवरून जाब विचारात धारेवर धरले; परंतु त्या अधिकार्याने 'मी बाहेर असल्याचे सांगताच जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वनाथ कोरडे, नवनाथ सालके, विश्वनाथ बडवे, शेखर सोमवंशी यांनी आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला.
कुकडी कालव्यातून सोडलेले आवर्तन नेमके कशाचे शेतीचे की, पिण्याच्या पाण्याचे?, दुष्काळी परिस्थितीत 'टेल टू हेड' अवर्तन पोलिस बंदोबस्तात सोडले जायचे. यावेळी मात्र पाटबंधारे विभागाने नेमके पारनेरसाठीच कसे आर्वतन सोडले असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होवू लागला आहे. तसेच, ओढ्याला इतके पाणी का सोडले? राळेगण थेरपाळ येथील ओढ्याची पर्यायी व्यवस्था असताना, शिवाय रस्त्याचे काम चालू असल्याची कल्पना असताना ओढ्याला कोणाच्या आदेशाने चार दिवस पाणी सोडले? असाही सवाल होत आहे. मागणी नसतानाही पाणी का? सोडले असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवाय ठेकेदाराने काम सुरू करताना मोठमोठे खड्डे खाणले आहेत. हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. यात पडून काही दुर्घटना घडली तर, त्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.