कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरू असून, या आवर्तनात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे पुरेशा दाबाने आवर्तन सोडण्यात आले नसून यामुळे तालुक्यातील करमणवाडी, येसवडी, काळेवाडी, करपडीसह पाच-सहा गावे पाण्यापासून वंचित राहण्याची तसेच थेरवडी, दुरगाव, चिलवडी व कोपर्डी येथील तलावही रिकामेच राहण्याची भीती होती. याच अनुषंगाने आमदार रोहित पवारांनी शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकरी व अधिकार्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली.
सध्या सुरू असलेले कुकडीचे आवर्तन 30 ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. परंतु, असे झाले तर तलावही रिकामेच राहतील. अनेक गाव पाण्यापासून वंचित राहतील हीच गोष्ट लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी अधिकार्यांना बरोबर घेऊन शेतकर्यांसह बैठक घेतली. 30 तारखेऐवजी 5 सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन शेतकर्यांना पुरेशा दाबाने आणि आवश्यक तेवढे पाणी सोडले जात होते.
परंतु, सध्या सत्तेत असलेल्या सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक गावे पाण्यापासून वंचित राहत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु, आमदार रोहित पवारांनी बैठक घेऊन याबाबत मार्ग काढण्यासाठी अधिकार्यांना बरोबर घेतले आहे. सरकार बदलल्यानंतर झालेल्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना त्याची अडचण होतेय, शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये, असे बैठकीत आमदार पवारांनी अधिकार्यांना सांगितले. त्यावर अधिकार्यांनीही सर्व भागाला पाणी मिळेपर्यंत पाणी सुरू ठेवण्याचा शब्द दिला.
महाविकास आघाडी सरकार असताना साडेतीन वर्ष आपण कुकडीबाबत अभ्यासू पद्धतीने नियोजन केले. 450 किलोमीटरची लाईन खोदली, गेट बसवले, अस्तरीकरण केले त्यामुळे शेतकर्यांना जास्त दाबाने पाणी मिळत होते. 2014-15ला 4300 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली होते. ते आता 16-17 हजारांवर योग्य नियोजनामुळे गेले आहे.
– रोहित पवार, आमदार
हेही वाचा