अहमदनगर

संगमनेर : फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक : आ. बाळासाहेब थोरात

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशामध्ये भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे, त्यांनी धर्माच्या नावाखाली राज्यात शिवसेना पक्ष फोडला त्या पाठोपाठ राष्ट्रवादी ही फोडली. राज्यघटना व लोकशाहीवर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका आ. बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली संगमनेर तालुक्यासह रणखांबवाडी कुंभारवाडी वरवंडी दरेवाडी ते कवठे मलकापूर हा आ. थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 16 कोटी 8 लाख रुपये निधीतील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, माजी जि प सदस्य अजय फटांगरे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, मांडवेचे माजी उपसरपंच भाऊ साहेब डोलनर , युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सचिन खेमनर, आण्णासाहेब कुंदनर, जयराम ढेरंगे, आदींसह पठार कार्यकर्ते उपस्थित होते .

आ. थोरात म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यासह पठार भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर नवीन कामांच्या निधीला स्थगिती दिली. मात्र स्थगितीबाबत आपण सातत्याने विधानभवनात आवाज उठविला त्यानंतर सध्याच्या सरकारने स्थगिती उठवली असल्यामुळे ही कामे वेगाने सुरू होणार आहे.
यात आता कुठली शंका राहणार नाही, आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही जण अपवाद असून काही जणांनी शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना या विकास कामांसाठी येण्याचे बंधन घालने चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली.

आगामी काळ काँग्रेसला अनुकूल

भाजप सरकारच्या काळात संपूर्ण देशात वाढलेली बेरोजगारी, वाढती महागाई यावर देशातील जनता नाराज आहे. मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळ हा काँग्रेसचाच राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT