अहमदनगर

Nagar News : सांगवीसूर्यात गारपीटग्रस्तांचे उपोषण; नुकसान भरपाईची मागणी

Laxman Dhenge

पारनेर/जवळा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सांगवी सूर्या येथील विठ्ठल मंदिर येथे पंचक्रोशीतील आठ ते दहा गावांच्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी सांगवी सूर्या, जवळा, पठारवाडी, निघोज, वडुले, पिंपळनेर, पानोली, गांजीभोयरे या परिसरात प्रचंड गारपीट होऊन पिके नष्ट झाली. या परिसरातील फळपिके, कांदा, भाजीपाला पिके, द्राक्ष व केळीबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. गारपिटीनंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. राजकीय नेत्यांचे दौरे पार पडले. परंतु, अद्याप नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली नाही.

या गावांतील चारा पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेजारील गावांतून जनावरांसाठी चारा आणावा लागत आहे. शासनाने या ठिकाणी किमान दोन महिने चारा डेपो तातडीने सुरू करावा, अशी येथील शेतकर्‍यांची मागणी आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, यावर्षीचे पीक कर्ज शासनाने भरण्याची हमी घ्यावी, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी आक्रमक आहेत. जनावरांसोबत शेतकरी उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सध्या साखळी उपोषण चालू केले आहे. परंतु, शासन, प्रशासनाने दखल न घेतल्यास तीन दिवसांनी याच ठिकाणी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

आमदार, खासदारांनी हा प्रश्न चालू अधिवेशनात मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे ग्रामसभांचे ठराव घेऊन प्रशासनाला उपोषणाबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तालुका प्रशासनाकडून नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस प्रशासनाने उपोषाणकर्त्यांची भेट घेऊन, त्यांच्या तीव्र भावना शासनाकडे पोहचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकर्‍यांनी शासनाविरोधी घोषणाबाजी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT