शेवगाव : जायकवाडी जलाशयातील आठ टीएमसी पाण्याचे आतापर्यंत बाष्पीभवन झाले आहे. या जलाशयातून वर्षभरात सुमारे 10 टीएमसी पाण्याचे बाप्पीभवन होते. पिण्यासह औद्योगिकीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या पाण्याइतकेच बाष्पीभवन होते. परिणामी जायकवाडी जलाशयावर अवलंबून असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
औरगांबाद, जालना, नगर, बीड जिल्ह्याची तहान भागविणारा जायकवाडी प्रकल्प जलमाताच बनला आहे. प्रत्येक वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरावे, अशीच विनवणी लाभार्थी निसर्गाला करतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस धो-धो बरसत आहे. परिणामी हे धरणही काठोकाठ भरते. यंदा उन्हाची तीव्रता दरवर्षीपेक्षा जरा अधिकच आहे.
परिणामी जलाशयाचे बाष्पीभवनही तितक्याच तीव्रतेने झाले आहे. परिणामी औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
1 जून 2021 ते आतापर्यंत जायकवाडीतील पाण्याचे 295.205 दलघमी म्हणजे 8 टीएमसी बाष्पीभवन झाले आहे. दररोज प्रतिसेकंद जवळपास 250 क्यूसेक पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. दरवर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत ढोबळपणे 370 ते 365 दलघमी म्हणजे 10 टीएमसी पाण्याचे बाप्पीभवन होते.
औरगांबाद, जालना, वाळूंज, चिखलठाणा, गंगापूर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी व इतर ठिकाणी पिण्यासह औद्योगिक क्षेत्राला जितके पाणी लागते, तितक्याच पाण्याचे बाष्पीभवन होते. या वर्षी वातावरण बदलाने पाणी बाष्पीभवनचा चढ उतार होत गेला.
सध्या धरणात 1685.383 दलघमी अर्थात 59 टीएमसी म्हणजेच 43 टक्के पाणीसाठा आहे. यात 27 टीएमसी मृत साठा, तर 32 टीएमसी वापरायोग्य पाणी आहे. जलाशयातून आजपर्यंत डाव्या कालव्यातून 653 दलघमी व उजव्या कालव्यातून 182 दलघमी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या डाव्या कालव्यातून 1 हजार 900 क्यूसेक, तर उजव्या कालव्यातून 200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग ऑक्टोबर 2021 पासून सुरू आहे.
पावसाळा जवळ आल्याने डॅमवरील सर्व कर्मचारी तैनात झाले असून, पावसाळापूर्व धरणदारांची देखभाल दुरुस्ती, जनरेटर देखभाल-दुरुस्ती व चाचणी, क्रेन देखभाल-दुरुस्ती, चनकवाडी निम्न बंधारा गेट देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ओव्हरफ्लो झाल्यानंतर जवळपास 28 धरणांचे पाणी गोदावरी, प्रवरानदीतून जायकवाडी धरणात झेपावते. काही धरणांचे पाणी धरणानजिक सोलेगावला येऊन मिळते. थोड्याच दिवसांत उन्हाची तीव्रता कमी होऊन पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण होणार असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण घटणार आहे.
असे मोजतात बाष्पीभवन
पाण्याचे बाष्पीभवन मोजण्यासाठी बाष्पीभवन यंत्राचा वापर करण्यात येतो. हे यंत्र पाण्याने पूर्ण भरले जाते. दुसर्या दिवशी कमी झालेल्या पाण्याचे मोजमाप करुन सूत्रानुसार दैनदिन बाष्पीभवन नोंदविले जाते. जायकवाडीच्या पाण्याचा परिघ 350 चौरस कि.मी. म्हणजे 35 हजार हेक्टरवर पाणी आहे. त्यानुसार बाष्पीभवन झालेल्या पाण्याची नोंद केली जाते.
हे ही वाचा :