अहमदनगर

बसचा प्रवास झाला धोकादायक ; टायर पंक्चर, बिघाडामुळे रात्री-अपरात्री बस पडताहेत बंद

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागला आहे. जुन्या आणि कालावधी संपलेल्या बस प्रवासी घेऊन धावत आहेत. रस्त्यावरून धावताना बस केव्हा बंद पडेल याचा भरोसा राहिला नाही. सध्या टायर पंक्चर, ब्रेकडाऊन आणि इंजिनमध्ये बिघाड आदी विविध कारणांमुळे बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वेळेवर आणि सुखरूप घरी पोहोचू याची शाश्वती आता प्रवाशांना राहिली नाही.

संबंधित बातम्या : 

माफक भाडे आणि सुरक्षितता त्यामुळे गोरगरिब आणि मध्यमवर्गीय जनतेला दळणवळणासाठी एसटी महामंडळाच्या बसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बसला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांपासून एसटीचा प्रवास धोकादायक वाटू लागला आहे. प्रवासी वाहतुकीसाठी महामंडळाच्या अहमदनगर विभागाकडे सध्या 585 बस आहेत. यातील बर्‍याच बस जुन्या आणि कालबाह्य झालेल्या आहेत. या बसवरच महामंडळाचा गाडा सुरू आहे.

बसचा तुटवडा असल्याने, आहे त्या बस प्रवासी वाहतुकीसाठी बाहेर काढल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच टायर पंक्चर, ब्रेकडाऊन आणि इंजिन बिघाडामुळे बस बंद पडत आहेत. दोन तीन दिवसांआड प्रत्येक बसस्थानकावर बस बंद पडलेल्या अवस्थेत आढळत आहेत. रस्त्यावरदेखील रात्रीअपरात्री बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा बस बंद पडल्यानंतर प्रवाशांवर बसला धक्का मारण्याची वेळ येते. काल-परवाच नगर शहरातील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर एक बस बंद पडली. धक्का मारून ती सुरू करण्याच्या प्रयत्नात वाहतूक कोंडी झाली. वारंवार घडणार्‍या या वाढत्या प्रकाराकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT