नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत 38.2 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, दमदार पावसाअभावी 59 गावे आणि 348 वाड्यांत अद्याप पाणीटंचाई कायम असल्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रिमझिम पावसात जवळपास शंभर टक्के खरीप पेरणी झाली. उगवणीसाठी पाऊस अपेक्षित आहे. मात्र, पावसाचा गुंगारा सुरूच आहे. हा गुंगारा असाच कायम राहिल्यास खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती बळावली आहे. निम्मा पावसाळा संपला आहे. त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट फिरू लागले आहे.
जिल्ह्यात गेले चार पावसाळे समाधानकारक होते. त्यामुळे सलग चार वर्षे जिल्हाभरातील धरणे ओव्हर-फ्लो झाली होती. नद्या, नाले वाहिल्यामुळे भूजलपातळी वाढली होती. परिणामी विहिरींची पातळी वाढून खरीप आणि रब्बी हंगाम जोमात होता. मुबलक पाऊस झाला तरीही, नेहमीप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार यंदा देखील एप्रिल व मे महिन्यात संगमनेर, पारनेर, अकोले, नगर, पाथर्डी या तालुक्यांतील काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु यंदा जून व जुलै महिन्यांत देखील दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे भूजलपातळी अद्याप वाढली नाही. त्यामुळे आजही 59 गावे आणि 348 गावांत पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
जून महिन्यात फक्त 58 मिलिमीटर, तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जादा म्हणजे 112 मिलिमीटर पाऊस झाला. या दोन महिन्यांत सरासरी 205.7 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र केवळ 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस दमदार नव्हताच. नद्या, नालेही वाहिले नाहीत. मात्र, या रिमझिम पावसातदेखील जिल्ह्यातील 5 लाख 69 हजार 9 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. पेरणी झाल्यानंतर पाऊस हवा आहे. परंतु पावसाने दडी मारली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे वर्तविले जात आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी पूर्ण करील याची शक्यता दिसत नाही. परिणामी भूजलपातळी खालावून टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढून रब्बी हंगामदेखील दगा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पेरणी (टक्केवारी )
नगर 106.6, पारनेर 81.76, श्रीगोंदा 139.26, कर्जत 68.3, जामखेड 113, शेवगाव 111.26, पाथर्डी 103.89, नेवासा 92.77, राहुरी 91.65, संगमनेर 79.27, अकोले 100.82, कोपरगाव 107.38, श्रीरामपूर 98, राहाता 103.
यंदा 'जायकवाडी'कडे राहणार लक्ष
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने भंडारदरा, निळवंडे व मुळा, आढळा ही धरणे 70 टक्के भरले आहेत. ही धरणे शंभर टक्के भरली, तरीही जायकवाडी धरण भरण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागते. जायकवाडी धरण 65 टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडावे लागते. त्यामुळे जायकवाडी धरण भरणे गरजेचे आहे. मात्र यंदा जायकवाडीची परिस्थिती कठीण दिसत आहे.
हेही वाचा :