चितळी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : प्रवरा सहकारी साखर कारखान्याने आठ वर्षांच्या करारावर चालवायला घेतलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी मोठा खर्च केला. या कराराला आधीन राहून पुढील करार महाविकास आघाडी सरकारने मंजूर होवून दिला नाही, परंतु शेतकर्यांचे सरकार राज्यात सत्तेत येताच गणेशचा करार झाला असल्याचा स्पष्ट खुलासा खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केला.
राहाता तालुक्यातील चितळी येथील कर्मयोगी शिवाजीराव परशराम पा. वाघ मंगल कार्यालयामध्ये आयोजीत शेतकरी बैठकीत खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील बोलत होते. बैठकीचे अध्यक्षस्थान गावच्या लोकनियुक्त सरपंच दीपालीताई वाघ यांनी भूषविले. यावेळी ज्येष्ठ नेते अॅड. अशोकराव वाघ, बाबासाहेब वाघ, विलासराव वाघ, नारायण कदम, बापूसाहेब लहारे, संदीप लहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. विखे पुढे म्हणाले, राहाता तालुक्यातील बंद पडलेला श्री गणेश सहकारी साखर कारखाना शेतकर्यांच्या आग्रहस्ताव प्रवरा सहकारी साखर कारखान्याने 2014 मध्ये आठ वर्षाच्या कराराने चालविण्यासाठी घेतला. परंतु सदर कारखान्याच्या मशिनरी अत्यंत जुन्या असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नव्हता. सदर मशिनरीमध्ये अनेक मोठे बदल करावे लागले. प्रत्येक वर्षी अधिकचा खर्च करुन खडतर परिस्थितीत गणेश कारखाना चालून दाखविला.
गणेश कारखान्याचा आठ वर्षाचा करार 2022 मध्ये संपणार होता. परंतु सदर कराराला आधीन राहून प्रवरेने 2021 मध्येच सरकारकडे सदर करार वाढविणेबाबत अर्ज केला. परंतु राज्यातील आघाडी सरकारने हा ठराव पारीत होवून दिला नाही. याउलट आमदाराच्या मेव्हण्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सदरचा खटला वर्षभर चालला. अखेर प्रवरेने गणेश कारखाना चालविण्यासाठी मोठा खर्च केला असल्याने उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली.
राज्यात शेतकर्यांचे युती सरकार सत्तेवर आल्यानंतर श्री गणेश कारखान्याच्या वाढीव कराराला मान्यता मिळाली. श्री गणेश कारखान्याची निवडणुक लागल्यानंतर गेली. आठ वर्षे ज्यांनी शेतकर्यांसाठी कधी जेसीबी दिला नाही, जे गणेशचा करार होवू नये म्हणून न्यायालयात गेले, न्यायालयात यांची केस चालविण्यासाठी जे वकील होते, ही सर्व मंडळी आज गणेशच्या निवडणुकीत उतरली आहे. जे या निवडणुकीत उमेदवारी करणार आहे, त्यांच्या उसाचे एक टीपरुही गणेशला येत नाही. कोपरगाव येथील संजीवनी, काळे व संगमनेर कारखान्याला ऊस घालणार्यांना गणेशच्या निवडणुकीत शेतकर्यांची झुंज लावून केवळ तमाशा बघायचा आहे, असा आरोप खा.डॉ. विखे पाटील यांनी केला.
महाराष्ट्र राज्य सरकारने श्री गणेश कारखाना 2014 मध्ये प्रवरेला चालवायला दिला आहे. त्यांच्यातील पुढील कराराबाबतची प्रक्रिया गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. परंतु आघाडी सरकारच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे गणेशची परवानगी व निवडणुक प्रक्रिया सरू होणे, हा केवळ योगायोग असल्याचा खुलासा खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केला.
बंद पडलेला श्री गणेश सहकारी साखर कारखाना चालविणे मोठे आव्हान होते. परंतु परिसरातील शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वाट्टेल ती किंमत मोजून हा कारखाना सुरु ठेवला. परंतु गेल्या आठ वर्षात शेतकर्यांच्या दारात न गेलेल्या लोकांना मार्गावर कसे आणायचे, यात आमची पीएच.डी. झाली आहे. हा वारसा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचेकडून आपण घेतला असल्याचे खा.डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
हेही वाचा