अहमदनगर

शेवगाव : मुळा आवर्तनाबाबत राजळे-घुले यांच्यात श्रेयवाद पेटला

अमृता चौगुले

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : मुळा आवर्तनाबाबत राजळे व घुले यांचा श्रेयवाद पेटला असून, दोघेही आपल्यामुळेच आवर्तन येत असल्याचा दावा करत आहेत. दोन्ही गटातील कार्यर्त्यांचे दावा केला आहे. मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने क्षेत्रीय परिस्थितीनुसार व लाभधारक शेतकर्‍यांच्या मागणीनुसार मुळा धरणातून शुक्रवारपासून (दि.1 सप्टेंबर) खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे.

खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्याबाबत 28 ऑगस्ट रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यानुसार शुक्रवारी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शेतातील पिके करपू लागल्याने शेतकर्‍यांनी आवर्तन सोडण्यासाठी मागणी केली होती. पावसा अभावी त्रस्त झालेला शेतकरी पाण्याचे श्रेय कोणीही घ्या; परंतु पूर्ण भरणे होईपर्यंत व प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍यांच्या पिकाला पाणी मिळेपर्यंत आवर्तन बंद करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

'आवर्तन काळात सहकार्य करावे'

आवर्तन टेल टू हेड नियोजन करावे, अशा सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर शेतकर्‍यांनी आवर्तन काळात अधिकार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

'डॉ. क्षितिज घुलेंना श्रेय'

मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन आवर्तन सोडण्याचे नियोजन केले. काही दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे मुळा धरणातून आवर्तन सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ. घुले यांनी दिल्यानंतर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पडले. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठे संकट शेतकर्‍यांपुढे निर्माण झाले आहे. परंतु, मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी घुलेंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍याचे फलित असल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT