Anna Hazare On AAP MP Join BJP:
अहिल्यानगर :
आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते राघव चड्ढा आणि इतर सहा राज्यसभा खासदारांनी शुक्रवारी 'आप'ला रामराम ठोकला. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना अण्णांनी स्पष्ट केले की, खासदारांच्या या सामूहिक एक्झिटला सर्वस्वी पक्षाचे नेतृत्व जबाबदार आहे.
अण्णा हजारे म्हणाले, "लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि आपला मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. राघव चड्ढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला याचा अर्थ त्यांना पक्षात नक्कीच काहीतरी त्रास झाला असणार. जर पक्षाने स्थापनेवेळची आपली तत्त्वे आणि योग्य मार्ग पाळला असता, तर आज ही लोकं सोडून गेली नसती."
आपल्या प्रतिक्रियेत अण्णांनी 'आप'च्या सध्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, "पक्षाची दिशा चुकली आहे. जर नेतृत्व योग्य पद्धतीने चालले असते, तर पक्षात फूट पडली नसती. त्यांना नक्कीच काहीतरी अडचणी आल्या असणार, ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला." विशेष म्हणजे, राघव चड्ढा यांनी देखील पक्ष सोडताना "मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस होतो," असे विधान केले होते.
राघव चड्ढा, स्वाती मालीवाल, संदीप पाठक आणि हरभजन सिंग यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे राज्यसभेत 'आप'चे संख्याबळ कमालीचे घटले आहे. १० पैकी ७ खासदारांनी (दोन-तृतीयांश) पक्ष सोडल्याचा दावा केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई टाळण्याचा प्रयत्न या गटाकडून होत आहे. दुसरीकडे, अण्णा हजारेंच्या या विधानामुळे अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.