कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरालगत म्हसोबा भागातील रहिवासी प्रकाश भालेराव यांच्या 3 शेळ्या रात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेळ्या बिबट्यानेच फस्त केल्याची माहिती पश ुपालकासह नागरिकांनी दिली. दरम्यान, बिबट्याने एक शेळी जबड्यात धरुन नेल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल 3 शेळ्या अचानक फस्त झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत मिळावी व बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड व विनय भगत यांनी वनविभागाकडे केली आहे. शहरात गेल्या 8 दिवसांपासून 2 बिबट्यांनी दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या सहा दिवसांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. शहरात विविध उपनगरांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचे नागरिक म्हणाले. इंदिरापथ भागात श्रद्धा प्याराटाईज परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या निदर्शनास आला. बिबट्याच्या पायांचे ठसे गाडीसह जमिनीवर आढळल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोपर्यंत दहशत निर्माण करणारे बिबटे जेरबंद होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा