Eating on right time Pudhari Photo
lifestyle

जेवणाची योग्य वेळ कोणती? वेळेवर जेवण करणे का आहे महत्त्वाचे; आहारतज्ज्ञ काय सांगतात

Eating on right time: ताटात काय वाढून घेता हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तुम्ही ते कधी खाता हे देखील महत्त्वाचे आहे, जाणून घ्या याविषयी अधिक

मोनिका क्षीरसागर

Eat on right time: दैनंदिन कामकाजातील व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा जेवणाच्या वेळा चुकतात. मात्र, वेळेवर जेवण केल्याने तुमची एकाग्रता, ऊर्जा आणि पचनक्रिया सुधारू शकते. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी जेवणाच्या वेळेचे नियोजन करणे का महत्त्वाचे आहे, हे जाणून घेऊया.

निरोगी राहण्यासाठी तुम्ही ताटात काय वाढून घेता हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तुम्ही ते कधी खाता हे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असाल किंवा ऑफिसमध्ये एकापाठोपाठ एक मीटिंग्जमध्ये व्यस्त असाल, तर अनेकदा तुमचे जेवण उशिरा होते, घाईघाईत होते किंवा पूर्णपणे चुकते. दुपारी नाश्ता, संध्याकाळी ५ वाजता जेवण आणि मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीचे जेवण... हे वेळापत्रक तुम्हाला अगदी जवळचं वाटते का? पण, खाण्यापिण्याच्या या अनियमित सवयी केवळ तात्पुरत्या गैरसोयीच्या नाहीत. कालांतराने, याचा तुमच्या पचनक्रियेवर, ऊर्जेवर, मनःस्थितीवर आणि अगदी मेंदूच्या कार्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

पचन ते बौद्धिक क्षमतेपर्यंत होतोय परिणाम

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल सांगतात, "अनियमित जेवणाच्या वेळा आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाला (Circadian Rhythm) बिघडवू शकतात आणि त्याचा परिणाम पचनापासून ते बौद्धिक क्षमतेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर होतो." जेवणामध्ये मोठे अंतर ठेवणे, घाईत अस्वास्थ्यकर पदार्थ खाणे आणि सतत थकवा जाणवणे, हे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गात खूप सामान्य आहे.

जेवणाची वेळ का महत्त्वाची आहे?

आपले शरीर एका आंतरिक घड्याळावर चालते, ज्याला 'जैविक घड्याळ' म्हणतात. हे केवळ झोपेचेच नियंत्रण करत नाही, तर दिवसभरात आपली पचनक्रिया, चयापचय (Metabolism) आणि भुकेचे संकेत कसे काम करतात, यावरही त्याचा प्रभाव असतो. या घड्याळानुसार जेवण केल्यास शरीराची सर्व कार्ये सुरळीत चालतात. जेव्हा तुम्ही जेवण टाळता किंवा खूप उशिरा जेवता, तेव्हा हे घड्याळ विस्कळीत होते. यामुळे तुम्हाला पोट फुगणे, ऊर्जा कमी होणे, मूड बदलणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचळे येऊ शकतात.

विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी, जेवणात मोठे अंतर ठेवल्याने किंवा घाईत जेवल्याने अनेकदा पोषक तत्वांची कमतरता असलेले पदार्थ निवडले जातात आणि ऊर्जेची पातळी कमी होते," असे नागपाल स्पष्ट करतात. आणि मग दिवसभर काम करण्यासाठी तुम्ही चिप्स, बिस्किटे किंवा कॉफीसारख्या पटकन उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून राहता.

मग, जेवायचे कधी?

प्रत्येकासाठी कोणतेही कठोर वेळापत्रक नाही, परंतु साधारणपणे, आहारतज्ज्ञ चयापचय क्रिया संतुलित ठेवण्यासाठी दर २.५ ते ३ तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला देतात. नागपाल म्हणतात, जेवणाची गुणवत्ता जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच जेवणाची वेळही महत्त्वाची आहे. चयापचय क्रिया संतुलित ठेवण्यासाठी दर २.५ ते ३ तासांनी जेवण करणे आदर्श आहे. याचा अर्थ सतत खाणे असा नाही, तर दिवसभर शरीराला स्थिर आणि नियमित ऊर्जा पुरवणे. सकाळी उठल्यानंतर पौष्टिक नाश्ता, वेळेवर दुपारचे जेवण आणि झोपण्याच्या काही तास आधी हलके रात्रीचे जेवण केल्याने मोठा फरक पडू शकतो. जेवणाच्या मधल्या वेळेत एखादे फळ, मूठभर भाजलेले चणे किंवा घरगुती नाश्ता खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते.

वेळेची अडचण: एक मोठी समस्या

या नियमांचे पालन करणे नेहमीच सोपे नसते. तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी उशीर करत असाल किंवा कामाच्या डेडलाइनमध्ये अडकलेले असाल, तर अनेकदा अन्नाकडे दुर्लक्ष होते. पण भुकेकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही तुमच्या शरीराला उपाशी ठेवून काम करण्याची सवय लावता, ज्यामुळे नंतर गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते, पचनक्रिया बिघडते आणि सतत थकवा जाणवतो. यावर उपाय म्हणून छोटी सुरुवात करा. शक्य असेल तेव्हा घरचा डबा सोबत ठेवा किंवा सहज खराब होणार नाही असे काहीतरी जवळ बाळगा. पनीर आणि भाज्यांचा साधा रोल, शेंगदाणे घातलेले पोहे किंवा उरलेली डाळ-भात यांसारखे पदार्थही योग्य वेळी खाल्ल्यास खूप फायदेशीर ठरतात. कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि फायबरने समृद्ध, संतुलित आणि पौष्टिक डब्याला प्राधान्य द्या. यामुळे रक्तातील साखर स्थिर राहण्यास, एकाग्रता सुधारण्यास आणि पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत होते," असे नागपाल सांगतात.

पालकांसाठी महत्त्वाचे: चांगल्या सवयी लहानपणापासूनच लागतात

खाण्यापिण्याच्या सवयी अनेकदा पुढच्या पिढीत उतरतात. मुले मोठ्यांचे निरीक्षण करतात. ते किती नियमितपणे, किती शांतपणे आणि कोणत्या वृत्तीने जेवतात. नागपाल आठवण करून देतात, लहानपणापासूनच वेळेवर जेवणाच्या सवयी स्वतःच्या वागण्यातून मुलांसमोर ठेवून आणि त्यांना शांतपणे जेवण्यास प्रोत्साहित करून पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. शक्य असेल तेव्हा एकत्र जेवणे, जेवताना फोन टाळणे आणि घरी जेवणाचे एक निश्चित वेळापत्रक ठेवल्याने मुलांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या निरोगी सवयी रुजतात.

नियोजन हे इच्छाशक्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे

वेळेवर जेवणे फार क्लिष्ट असण्याची गरज नाही. आदल्या रात्री थोडी तयारी करणे किंवा वेळेवर आठवण करून देणारे रिमाइंडर लावणे यांसारख्या छोट्या नियोजनाने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाला अनुकूल अशी लय तयार करू शकता. नागपाल यांच्या मते, जेवणाची पूर्वतयारी करणे किंवा योग्य अन्नपदार्थांची निवड करणे यासारख्या साध्या नियोजनानेही दिवसभर ऊर्जा आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मोठा फरक पडू शकतो. तुम्ही उशिरापर्यंत काम करत असाल किंवा पुढच्या लेक्चरसाठी धावत असाल, तुमच्या शरीराला वेळेवर आहार देणे ही कोणतीही चैनीची गोष्ट नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही योग्य आणि वेळेवर खाता, तेव्हा बाकी सर्व गोष्टी थोड्या सोप्या वाटू लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT