जयपूर : हजारो वर्षांपासून माणूस आणि प्राणी एकमेकांसोबत राहत आहेत. माणसाने अनेक वेळा जनावरांना लळा लावून त्यांना पाळीव बनवले आणि त्यांचा वापर कधी शेतीसाठी, वाहतुकीसाठी तर कधी आपल्या मनोरंजनासाठी केला; पण प्रत्येकवेळी त्यांच्यात असा लळा राहीलच याची खात्री नसते. जंगली जनावरांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. यातूनच माणूस आणि प्राणी संघर्षाच्या घटना घडतात.
माणसाकडून जशी प्राण्यांची शिकार केली जाते, तशीच काहीवेळा प्राण्यांनीही माणसांना ठार केल्याच्या घटना आपल्या कानावर अनेकवेळा येत असतात. असे असताना एक राजस्थानी गाव याला अपवाद आहे. तेेथे बिबटे व गावकरी गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहतात. राजस्थानातील 'बेरा कसबे' असे या गावाचे नाव. या गावाला 'बिबट्यांचे गाव' असेही म्हटले जाते. कारण एका अहवालानुसार, बेरा कसबेच्या परिसरातील 10 गावांत सर्वाधिक 100 बिबटे राहतात.
एखाद्या परिसरात इतक्या मोठ्या संख्येने बिबटे राहण्याची जगातील ही एकमेव घटना आहे. बरं, मागच्या अनेक वर्षांपासून एकदाही त्यांच्याकडून ग्रामस्थांवर हल्ला केलेला नाही की, गावकर्यांनी त्यांची शिकारही केली नाही. इथल्या अनेक मंदिरांभोवती, शेतात, गावात बिबटे बिनधास्त फिरताना दिसतात. त्यांच्याकडून हल्लाही होत नसल्याने कोणीही या बिबट्यांची शिकार करत नाहीत. बिबट्यांसोबत खुशीने राहणारे हे लोक रबारी जातीचे आहेत. ही भटकी जमात असून, ती हजारो वर्षांपूर्वी इराणमधून अफगाणिस्तानमार्गे राजस्थानमध्ये आली आणि तिथेच स्थायिक झाली. हे लोक भगवान शंकराचे उपासक आहेत.