नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबक रोडवरील आय. टी. आय सिग्नल जवळ चालत्या रिक्षावर गुलमोहराचे वृक्ष उन्मळून पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली व रिक्षात अडकलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत रिक्षाचालक पोपट सोनवणे व एक प्रवासी महिला शैला पटणी या दोघांचा मृत्यू झाला आहे. ही रिक्षा शहरातून सातपूरकडे निघाली होती. चालत्या रिक्षेवर अचानक झाड पडल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून शहरातील धोकादायक झाड तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.