पुढारी ऑनलाइन डेस्क : नवरात्र 2022 : शक्तिच्या उपासनेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. यावर्षी उद्या सोमवार दि 26 पासून या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्र म्हणजे एकीकडे, गरबा, दांडिया, लोकनृत्य साज शृंगार करून मोठ्या प्रमाणात देवीची आराधना आणि आनंद उत्सव साजरा करणे. पण या पलिकडे अनेक जण नवरात्रीमध्ये कडक व्रताचरण देखिल करतात. त्यामध्ये नऊ दिवसांचे उपवास असतात. तसेच अनवाणी चालत जाऊन देवीचे दर्शन घेणे. तर संपूर्ण नऊ दिवस पायातील चपलांचा त्याग करणे. असे हे कठोर व्रतारचण अनेक जण पाळतात. पण तुम्हाला माहित आहे का नवरात्रीत चपला का घालत नाही?
नवरात्र 2022 : आपल्याकडे अनेक प्रथा परंपरा अशा आहेत ज्या पिढीजात परंपरेने आपण पाळत आलो आहोत. एका पिढीकडून दुस-या पिढीत हे संस्कार केले जातात. परिणामी आपण कधी या परंपरांना 'का' हा प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. आई-वडील, आजी-आजोबा करतात म्हणून आम्हीपण करतो. एवढेच आपल्याला माहित असते. त्यामुळे आपल्याला कोणी जर विचारले की नवरात्रीत चपला का सोडतात याचे उत्तर माहित नसते. परिणामी अनेक वेळा काही जण याला अंधश्रद्धा देखिल म्हणतात. त्यामुळे आपण पाळत असलेल्या प्रथा आणि परंपरामागे नेमकी काय धारणा आहे हे माहित करून घेणे गरजेचे आहे.
आपल्याला माहितच आहे की नवरात्र हा अत्यंत प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा सण आहे. त्या काळात आजच्या काळाप्रमाणे फायबर, रबर, प्लास्टिक, वेल्वेट कापड, किंवा अन्य साहित्यापासून चपला, बूट बनवले जात नव्हते. त्या काळात चपला बनवण्यासाठी एकच साहित्य होते. ते म्हणजे चामडे. चामडे मिळवण्यासाठी मुक्या जनावरांचा बळी द्यावा लागतो. त्यामुळे देवीच्या नवरात्र उत्सवाच्या काळात चामडे परिधान करणे वर्ज्य मानण्यात आले आहे. तसेच याचा अध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर चामडे म्हणजेच कातडी. आपले शरीरावर देखिल कातडीच असते. त्यामुळे आपल्या शरीराचा विचार न करता आपण किमान मंदिरात जाताना तरी आपण आपल्या देहाचा नाही तर मन आणि आपल्या ख-या चित्ताकडे आपले ध्यान केंद्रित करायला हवे. हा या मागचा उद्देश होता.
नवरात्र 2022 : दुसरे कारण असे, ज्या काळात या परंपरा बनल्या त्या काळात आजच्या सारखे डांबरी रोड नव्हते. देवीचे मंदिर हे शक्यतो डोंगरावर किंवा उंचीच्या ठिकाणावर असते. शारदीय नवरात्रीचा जो काळ असतो. तो पावसाळ्याच्या अगदी शेवटी आलेला असतो. त्यामुळे या दिवसापर्यंत जमिनीत पाणी मुरून त्यात ओलावा निर्माण झालेला असतो. मंदिरात जाण्यासाठी पायवाट असायची त्यामुळे सहसा अशा ठिकाणी अनवाणी पायाने चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असत. त्यामुळे या नऊ दिवसात आपोआपच पायांचे अॅक्युप्रेशरचे पॉइंट दाबले जातात त्याचेही अतिरिक्त फायदे मिळतात.
तिसरे कारण म्हणजे देवीवर असलेली असीम श्रद्धा आणि त्यामुळेच आपण सतत देवीकडे काही ना काही मागणे मागत असतो. तुम्ही जेव्हा आदी शक्ति प्रकृतीकडून काही मागता तर त्यावेळी ही प्रकृती देखिल तुमच्याकडून काही त्यागाची अपेक्षा व्यक्त करते. जेणेकरून तुमच्यामनातील अहम् भाव कमी व्हायला हवा. कारण जुन्या काळात फक्त चामड्याच्या चपला बनवल्या जायच्या ते ही चांभाराकडून बनवून घेतल्या जायच्या. परिणामी अनेक गोरगरीबांकडे त्याकाळात पायात घालायला चपला नसायच्या आणि देवी आदि शक्ती परम शक्तीपुढे सर्वजण समान असतात. त्यामुळे मंदिरात येताना प्रत्येकाच्याच पायाला फक्त मातीचाच सुगंध असावा. श्रीमंतांचा अहम् भाव कमी व्हावा यासाठी इथल्या ऋषिमुनी आणि संतांनी या परंपरा निर्माण केल्या.