Latest

पाण्याची चिंता मिटली! पवना धरण 100% भरले

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील काही भाग आणि एमआयडीसीची तहान भागविणार्‍या पवना धरण सोमवारी (दि. 21) सायंकाळी पाचपर्यंत 100 टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा मौसमात पावसाने उशिरा हजेरी लावली. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. त्यामुळे 16 टक्क्यांवर पोहोचलेले पवना धरणात पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली. धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्याने निम्मे (50 टक्के) धरण 20 जुलैच्या दिवशी भरले. त्या महिन्याअखेरीस धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. दोन ऑगस्टला पाणीसाठा 90 टक्के झाला.

दरम्यान, पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने 3 ऑगस्टपासून तीन दिवस 1,400 क्सुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला. विश्रांतीनंतर पावसाची संततधार सुरू झाल्याने पाणीसाठा वाढीस सुरुवात झाली. 13 ऑगस्टला धरण 96 टक्के भरले. पाऊस कमी असला तरी, धरणात साठा हळूहळू वाढू लागला.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्युतगृहाऐवजी धरणाच्या सांडव्यातून 15 ते 17 ऑगस्ट असे तीन दिवस पाणी सोडण्यात आले. साठा वाढल्याने सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत धरण 99.72 टक्के भरले. धरणात 8.48 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आज 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 2,156 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांचा तसेच, एमआयडीसीच्या वर्षभराचा पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, असे धरणाचे अभियंता समीर मोरे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 100 टक्के पाणीसाठा होता. तर, एकूण 2,809 मिलिमीटर पाऊस झाला होता.

प्रशासकीय राजवटीत जलपूजन होणार?

महापालिकेत लोकप्रतिनिधी असताना पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर महापौरांच्या हस्ते धरणावर जाऊन रितसर जलपूजन केले जात होते. मात्र, 12 मार्च 2022 पासून महापालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत आयुक्त किंवा अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजनास गेल्य वर्षीपासून फाटा देण्यात आला आहे. यंदाही जलपूजन होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पवना धरण 15 ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरते. यंदा सहा दिवस उशिरा म्हणजे 21 ऑगस्टला भरले आहे. हे पाणी पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेल इतके आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर प्रमुख श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

धरणातील साठा          आतापर्यंतचा पाऊस      उपयुक्त साठा
पवना-100 टक्के          2,156 मिलिमीटर      8.84 टीएमसी
मुळशी-88.04 टक्के     2,047 मिलिमीटर     17.74 टीएमसी
आंद्रा-94.33 टक्के        707 मिलिमीटर      2.76 टीएमसी
भामा आसखेड – 84.90 टक्के 509 मिलिमीटर 6.51 टीएमसी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT