पुढारी ऑनलाईन
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई ) बारावी बोर्डाच्या समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रीकेत विचारलेल्या एका प्रश्नावरुन ( CBSE question ) वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावरुन 'सीबीएसई' बोर्डाने माफीही मागितली आहे. मात्र या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
'सीबीएसई' बारावी बोर्डाच्या पहिल्या सत्रातील समाजशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नावरुन ( CBSE question ) प्रश्न क्रमांक २३ होता की, कोणाचे सरकार सत्तेत असताना २००२ मध्ये गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचार झाला। या प्रश्नाच्या उत्तरासाठी भाजप, काँग्रेस, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले होते. यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना निवडायचा होता. या प्रश्नावरुन वाद झाल्यानंतर याची गंभीर दखल सीबीएसईने घेतली.
समाजशास्त्र विषयाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा होता. हा प्रश्नच सीबीएसईच्या मागदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा ठरला आहे.आम्ही या चुकीची दखल घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा खुलासा करत या प्रश्नावर सीबीएसईने ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे.