Latest

Mumbai High Court : वेळ वाया गेला, आता सहा महिने समुद्र किनारा स्वच्छ करा : मुंबई उच्च न्यायालयाची ८ जणांना शिक्षा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने  (mumbai high court) १२ वर्षे जुन्या दोन खटल्यांवर सुनावणी करताना ८ जणांना अनोखी शिक्षा सुनावली आहे. न्‍यायालयाने  त्यांना सलग ६ महिने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, या लोकांना पर्यावरणवादी आणि वकील अफरोज शाह यांच्या सहकार्याने हे काम करावे लागणार आहे.

(mumbai high court) याबाबत अधिक माहिती अशी, २०१० मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्‍हा दाखल झाला होता. मात्र, काही वेळाने दोन्ही बाजूंनी एकमत झाले. मात्र, ही माहिती न्यायालयाला देण्यात आली नाही. याचा परिणाम असा झाला की, हे प्रकरण १२ वर्षे कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित राहिले.

न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठासमोर याच प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ५ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने म्हटले की, पक्षकारांमध्ये समझोता झाल्यानंतर एफआयआरला आता काही अर्थ नाही. त्यामुळे न्यायालयाने आयपीसीच्या कलम ४८२ अन्वये आपल्या अधिकाराचा वापर करत कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाही रद्द केली. आणि इतके दिवस कोर्टाला कराराची माहिती न दिल्याने दोन्ही पक्षांच्या एकूण ८ जणांना शिक्षा सुनावली.

Mumbai High Court : प्रकरण काय होते ?

पहिले प्रकरण ब्लॅकमेलिंगशी संबंधित आहे. २७ एप्रिल २०१० रोजी एका मुलीने आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरनुसार, तरुणीच्या काही मित्रांनी तिला अल्कोहोल मिसळलेले कोल्डड्रिंक दिले. यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो काढले. काही वेळाने ते तिला ब्लॅकमेल करू लागले. तरुणीच्या म्हणण्यानुसार, ब्लॅकमेलर्सनी तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर २४ एप्रिल २०१० रोजी त्याने तरुणीकडे रोख रक्कम आणि सोन्याची मागणी केली. यानंतर तरुणीने एफआयआर दाखल केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले होते.

दुसरे प्रकरण पैसे उकळण्याशी संबंधित आहे. या प्रकरणी १ मे २०१० रोजी चारकोप पोलीस ठाण्यात तरुणाने तक्ररा दिली.  या प्रकरणी दाखल एफआयआरनुसार, २३ एप्रिल २०१० रोजी तरुणीने त्याला तिच्या घरी बोलावले. तो तिच्या घरी पोहोचल्यावर तरुणीने त्याच्याकडून ५० हजारांची रोकड आणि दुचाकी घेतली. तरुणाने तिच्याकडे पैसे आणि दुचाकी मागितली असता तरुणीने त्याला घराबाहेर काढत  आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तो तरुण तिथून निघून जाण्यास तयार न झाल्याने तरुणीने त्याला एका साध्या कागदावर दोन लाख रुपये उसने दिल्याचे लिहायला लावले. या घटनेनंतर तरुणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT