Latest

Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. अर्थात घाटमाथ्यावर पाऊस आहे. परंतु तो तुरळक ठिकाणीच बरसेल. उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मान्सून बरसण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण कमी झाले आहे. दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो बांगला देशाच्या किनारपट्टीकडे सरकला आहे.

पुढील 24 तासांत हा पट्टा पश्चिम बंगालची किनारपट्टी ते गॅगस्टिक पार करणार आहे. त्यामुळे या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याच्या तीव्रतेचा प्रभाव राज्यातील पावसावर होणार नाही. याशिवाय मान्सूनचा ट्रफ हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचला आहे. त्यामुळेही राज्यातील पाऊस कमी होण्यास कारणीभूत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस कोकणात किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बर्‍याच ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात
आला आहे.

पुढील पाच दिवसांतील अलर्ट
पालघर : ऑरेंज, ठाणे : यलो, मुंबई : यलो, रायगड : ऑरेंज, रत्नागिरी : ऑरेंज, सिंधुदुर्ग : यलो, धुळे : यलो, जळगाव : यलो, पुणे : ऑरेंज (घाट), सातारा : ऑरेंज (घाटमाथा), जालना : यलो, परभणी : यलो, हिंगोली : यलो, नांदेड : यलो, अकोला : यलो, अमरावती : यलो, भंडारा : यलो, चंद्रपूर : यलो, गडचिरोली : यलो, गोंदिया : यलो, वर्धा : यलो, वाशिम : यलो, यवतमाळ : यलो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT